US-Iran War | मागील पाच आठवड्यांपासून अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यात जोरदार युद्ध (War) सुरू होते. या युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता अमेरिकेने आणि इराणने एकमेकांच्या अटी मान्य करत युद्धविरामाची घोषणा केली आहे. या युद्धाला आता तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. यापार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांनी आपल्या लष्करी जवानांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – जगाला दिलासा! अमेरिका-इराण युद्धविराम जाहीर, इराणने ठेवल्या 10 अटी
मोजतबा खामेनेई यांनी काय दिले आदेश?
नुकतीच इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबीवरून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या निवेदनात इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या लष्करी तुकड्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. “हा या युद्धाचा कायमस्वरूपी अंत नाहीये. मात्र सध्याची परिस्थिती बघता सर्व लष्करी गटांनी सर्वोच्च नेत्याच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व लष्करी तुकड्यांनी तात्काळ गोळीबार थांबवावा”, असे आदेश मोजतबा खामेनेई यांनी दिले आहे.
मोजतबा खामेनेई यांनी दिलेल्या या आदेशानंतर इराणच्या लष्करी तुकड्यांनी गोळीबार बंद केला आहे. त्यामुळे सध्या इराणच्या सीमेवर शांतता पसरली आहे आणि लष्करी हालचाली थांबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या युद्धाबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं आहे की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या वतीने मी आमचे प्रिय बंधू पाकिस्तानचे माननीय पंतप्रधान शरीफ आणि माननीय फील्ड मार्शल मुनीर यांनी या प्रदेशातील युद्ध संपवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलेल्या बंधुत्वाच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून आणि अमेरिकेच्या 15 कलमी प्रस्तावावर आधारित चर्चेच्या विनंतीचा तसेच इराणच्या 10 कलमी प्रस्तावाची सर्वसाधारण चौकट वाटाघाटींचा आधार मानली जाईल. या राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेचा विचार करून, मी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करतो की, जर इराणवरील हल्ले थांबवले गेले तर आमचे शक्तिशाली सशस्त्र दल आपली बचावात्मक कारवाई थांबवतील. पुढील दोन आठवड्यांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गक्रमण शक्य होईल, जे इराणी सशस्त्र दलांच्या समन्वयाने आणि तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन केले जाऊ शकते”, असं अब्बास अराघची म्हणाले.












