Jishnu Dev Varma | जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी (Governor Of Maharashtra) नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णू देव वर्मा हे याआधी तेलंगणाचे (Telangana) राज्यपाल होते. पण आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून तेलंगणाच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला (Shiv Pratap Shukla) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णु देव वर्मा यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (President Draupadi Murmu) यांनी केली आहे.
हेही वाचा – टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, थरारक सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव
कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच जिष्णू वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे.
जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी अगरतळा येथे झाला. वर्मा यांनी कोलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्याची पदवी घेतली आहे. तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 1990 साली भाजप पक्षात प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर वर्मा यांनी 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2018 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. 2018 ते 2023 या कालावधीमध्ये त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण विकास, वित्त, उर्जा यांसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली आहेत. तसेच त्रिपुरा राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही वर्मा यांनी भर दिला होता.
जिष्णू वर्मा यांनी आधी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम केले होते. तर आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजकारणातील दांडगा अनुभव पाहता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, जिष्णू वर्मा यांची निवड करण्याअगोदर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत हे सांभाळत होते. 15 सप्टेंबर 2025 रोजी आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. पाच महिन्यांच्या कारकिर्दीत देवव्रत यांनी महाराष्ट्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी प्राकृतिक शेतीसाठी महाराष्ट्रात आग्रही भूमिका मांडत प्रयोग केले होते.












