Land for Job Case : ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लालूंच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुटुंबप्रमुख लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. शिवाय, मुलगा तेज प्रताप, मुलगा तेजस्वी आणि मुलगी हेमा यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात न्यायालयानं 98 आरोपींपैकी 52 जणांना निर्दोष सोडलं आहे हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे.
‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळा म्हणजे काय? :
‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळा हा कथित भ्रष्टाचाराचा खटला आहे. 2004 ते 2009 दरम्यान लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वे मंत्री असताना हा घोटाळा घडला. असा आरोप आहे की लालू यादव यांनी रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांवर नियुक्त्या करण्यासाठी रेल्वे मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला. या नियुक्त्यांच्या बदल्यात, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं उमेदवारांकडून सवलतीच्या दरात किंवा भेटवस्तू म्हणून जमीन मिळवली.
98 आरोपींमध्ये लालू कुटुंबातील कोणाचा समावेश? :
तपासादरम्यान, या प्रकरणात एकूण 98 जणांना आरोपी म्हणून नाव देण्यात आलं, ज्यात लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजप्रताप यादव, मुलगा तेजस्वी यादव आणि मुली मीसा भारती आणि हेमा यादव यांचा समावेश आहे. लालू कुटुंबातील सदस्यांविरुद्ध आता आरोप निश्चित करण्यात आले आहेत, तर 52 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
लालू कुटुंबाला किती शिक्षा होऊ शकते? :
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित झाल्यानंतर लालू कुटुंबातील सदस्यांना होणाऱ्या शिक्षेबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप मिश्रा यांनी सांगितलं की, “भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8, 9, 11, 12 आणि 13 लागू आहेत. या सर्व कलमांमध्ये 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. कलम 467, 468 आणि 471 देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळं एकाच वेळी शिक्षा भोगल्यास जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.” परंतु जर न्यायालयानं एकामागून एक शिक्षा सुरु करण्याचा आदेश दिला तर शिक्षा वाढवता येते.





