Laxman Hake | सध्या बारामती (Baramati) विधानसभा निवडणुकांवरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकिकडे या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रणांगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने बारामती विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार मैदानात उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील सर्व पक्षांना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान आता या निवडणुकीच्या मैदानात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – एका बॉटलने घडवला अपघात? मुंबई-गोवा हायवेवर खासगी बस उलटल्याने 2 जणांचा मृत्यू, 38 प्रवासी जखमी
लक्ष्मण हाकेंनी काय केली घोषणा?
लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रचंड नाराज आहोत, आमचे आरक्षण गेले आहे. आमच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाहीये, त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, अशी मोठी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
निवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले लक्ष्मण हाके?
निवडणूक लढवण्याबाबत लक्ष्मण हाके म्हणाले की, माझा राष्ट्रीय पक्षांशी संपर्क झाला आहे. त्यामुळे काही राष्ट्रीय पक्षांचा मला पाठिंबा मिळणार आहे. तसेच ही निवडणूक आपण मोठ्या ताकदीने लढणार आहोत, असं हाके यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की आम्ही ग्रामपंचायतीचे साधे सदस्य देखील नाही आहोत. पण, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे वारे प्यालो आहोत. ओबीसींसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची आहे आणि या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. आम्ही चळवळीतील माणसं असून आम्हाला संविधान आणि लोकशाहीचा सन्मान करणे माहिती आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे आवाहन केले आहे त्याबाबत जेव्हा आमने सामने चर्चा होईल तेव्हा विचार केला जाईल. आमचे जे प्रश्न आहेत त्याबाबत काय होईल याची चिंता आम्हाला आहे. सध्या वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
दरम्यान, लक्ष्मण हाकेंनी बारामतीच्या या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. बारामतीत राजकीय लढत रंगणार असल्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतंय की, सुनेत्रा ताईंना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहीजे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्रात यापूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक झाली आहे. आर आर पाटील आबांच्या निधनानंतर भाजपने पोटनिवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. त्यावेळी भाजपने उमेदवार देखील दिला नव्हता. त्यामुळे आताही सर्व पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे.












