Congress-MNS alliance : मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेसने ‘एक ला चलो’ चा नारा दिला आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जाण्यास सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. मग खोडा कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात आणि राज्यात काँग्रेसची वाताहात झाल्याचे चित्र असताना, मुंबई महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेस उसणे अवसान आणू पाहात असल्याचे काही दिवसांच्या त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ही भूमिका पक्षातील काही ज्येष्ठांना पडलेली दिसत नाही.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी महापालिका निवडणूकीत काँग्रेस मनसेसोबत जाणार नसल्याचे जाहीर केलं होतं. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचे संकेत देण्यात होते. त्यामुळे काँग्रेस पक्षात मनसेसोबत जाण्यावरून दोन मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहेत. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जुळवून घेण्याविषयीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या ऐन तोंडावर पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप गटाचे पदाधिकारी यांच्यात झाला राडा; वातावरण तापले
मनसेसोबत जाण्यास सकारात्मक – विजय वडेट्टीवार
मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ मतचोरी संदर्भात आयोजित करण्यात आला होता. लोकशाही वाचवण्यासाठी होता. शेवटी आयडिओलाॅजीचा प्रश्न महत्त्वाचा असतो. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडली आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहीजे, अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्या संदर्भात सकारात्मक आहोत, असं मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
सत्याच्या मोर्चात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा हिरारीने सहभाग घेतला. इतकेच काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच या मोर्चासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थितीत असले तरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आता भाजपला महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचा सूर आळवल्याचे दिसून येत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक आई, भाऊ, मुलगा, बायको, वहिनी, दीर, जाऊ बिनविरोध निवडून आले आहे. दादागिरी, गुंडगिरी करून कुठे पैशाचे प्रलोभन दाखवून पोलिसी बळाचा वापर करून निवडणुका बिनविरोध केलेल्या आहेत.
लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. भाजपचा मुख्यमंत्री असल्याने… pic.twitter.com/hf6srIxaCm
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 22, 2025
भाजपला लोकशाही संपवायची आहे…
भाजप मुंबई महापालिकेत दणदणीत विजय मिळवणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ते भाजपने केलेला सर्वेक्षण असून भाजपने निर्माण केलेली काल्पनिक कथा आहे, स्वतःच मीडियाकडे माहिती द्यायची. हा लोकांचा परसेप्शन बदलविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. काल मुंबईत अनेक मतदारांना ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे भाजपला वाटत असावं जे बिहारमध्ये केलं ते मुंबईत करून दाखवू. त्यांना लोकशाही संपवायची आहे, म्हणून ते म्हणतात महाविकास आघाडी किंचित उरेल. इमानदारीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या सर्व समोर येईल. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.
सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा
दादागिरी, गुंडगिरीकरून पैसा, दबावतंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध झाले आहे. पोलीस बळाचा वापर करून, धामकावून निवडणूक बिनविरोध होत असेल आणि हे आम्ही बिनविरोध निवडून आल्याची पाठ थोपटून घेत असेल तर असेच होणार. सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा, असा सणसणीत टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
काँग्रेस पक्षात मेंदू कोणाकडे आहे ? – संदिप देशपांडे
मुळात ना काँग्रेस पक्ष हा अमिबा सारखा आहे. इकडे पाय, तिकडे पाय, सगळीकडे पाय आहे, एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो. मुळात मेंदू त्यांच्याकडे कोणाकडे आहे. म्हणजे निर्णायक क्षमता मुळात या पक्षात कोणाकडेच नाही. निर्णायक क्षमता या पक्षात पायाकडे आहे की मेंदूकडे आहे. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो, असं करू या, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो तसं करू या, भाई जगतापांचा पाय आणखीन तिसरीकडेच चालतो. अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडं आहे पाय सर्वांचेच चालतात असा घणाघात मनसे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे.





