सध्या मित्रांनी केलेल्या एका क्रुर घटनेमुळे मुंबई हदरून निघाली आहे. वाढदिवस साजरी करायला आलेल्या ५ मित्रांनी मिळून बर्डे बाॅयच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या मित्राचा वाढदिवस होता त्याच्या अंगावर अधिक अंडी, दगड अन् नंतर पेट्रोल ओतून त्याला पोटवून दिलं. या घटनेत अब्दुल रहमान नावाचा २१ वर्षीय तरुण गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अब्दुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये राहणाऱ्या अब्दुल रहमानचा सोमवारी (२५ नोव्हेंबर) २१ वा वाढदिवस होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याचे पाच मित्र त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी इमारतीखाली बोलावले. मित्रांनी सोबत केकही आणला होता. अब्दुल खाली आल्यानंतर त्याचे पाच मित्र अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजेफा खान, आणि शरीफ शेख यांनी सुरुवातीला केक कापला. इथपर्यंत सर्व काही ठिक होतं. कोणाच्या मनात काहीच शंका नव्हती. मात्र, सर्व प्रकार यापुढे घडला.
हेही वाचा – अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात जखमी झालेल्याा महिलेचा मृत्यू
अब्दुल रहमानने कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला
केक कापल्यानंतर मित्रांनी त्याच्या तोंडाला लावला. त्यानंतर त्याच्या अंगावर अंडी फोडण्यात आली. त्यापुढे जाऊन दगड फेकून मारण्यात आली. हा प्रकार यावरच न थांबता या मित्रांनी एका बाटलीत एका ज्वलनशील पदार्थ आणला होता. तो अब्दुलच्या अंगावर टाकला आणि त्याला आग लावली. अचानक आग लागल्याने अब्दुल रहमानने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो ६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जखमी झालेल्या अब्दुल रहमानला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे. पीडित अब्दुल रहमानने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठली
पोलिसांनी अयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान, शरीफ शेख या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम ३ (५) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विनोबा भावे पोलीस करत आहेत. आरोपींनी अब्दुलवर टाकलेला ज्वलनशील पदार्थ नेमका काय होता, याची पोलीस पडताळणी करत आहेत. हा गुन्हा केवळ वाढदिवसाच्या मस्करीतून झाला की यामागे काही कटकारस्थान होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.












