PM Narendra Modi | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी आज (10 एप्रिल) राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. नितीश हे दोनदा विधानसभेचे आणि चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. 30 मार्च रोजी त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर नितीश कुमार हे सहा वेळा लोकसभेचे सदस्य देखील राहिले आहेत. तर आता त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आहे.
हेही वाचा – “VSR च्या मालकाला तो बडा नेता भेटला…”, रोहित पवारांचे स्फोटक ट्विट, केला गंभीर दावा
नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की, त्यांना चारही सभागृहांचा भाग व्हायचे आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला होता. तर आज त्यांनी राज्यसभेत प्रवेश करत शपथ घेतली. त्यानंतर आता नितीश कुमार यांच्या केंद्रीय राजकारणातील पुनरागमनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्यासाठी एक खास ट्विट केले आहे.
नितीश कुमारांबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
नितीश कुमार यांच्या राज्यसभेतील प्रवेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नितीश कुमारजी हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. सुशासनाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. बिहारच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच आता त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाहणे आनंददायी ठरेल. त्यांनी अनेक वर्षे खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. मला खात्री आहे की, त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव संसदेची प्रतिष्ठा आणखी वाढवेल. राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांचे तोंडभरून कौतुक केले.
नीतीश कुमार जी देश के सबसे अनुभवी नेताओं में से एक हैं। सुशासन को लेकर उनकी प्रतिबद्धता की हर तरफ सराहना हुई है। उन्होंने बिहार के विकास में अमिट योगदान दिया है। उन्हें एक बार फिर संसद में देखना बहुत सुखद होगा। सांसद और केंद्रीय मंत्री के रूप में भी उन्होंने कई वर्षों तक अपनी…
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2026
आजपासून नितीश कुमार हे राज्यसभा खासदार म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहेत. एकिकडे नितीश कुमार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली आहे तर दुसरीकडे बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. आज दिल्लीत भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक होणार असून, यामध्ये पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत. यासाठी अनेक नावे शर्यतीत आहेत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारीही सुरू झाली आहे.











