PM Narendra Modi | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या संघर्षामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे हे युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेतील या युद्धामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. इराणच्या होर्मुझ खाडीत (Hormuz Strait) अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे बाकी देशांसह भारतालाही मोठा धक्का बसला आहे. भारतात गॅस, इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशवासियांना मोठे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नेमके काय आवाहन केले?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट, जागतिक परिस्थिती यावर भाष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे ते देश ऊर्जा गरजांसाठी महत्त्वाचे आहेत. या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलसंदर्भात जागतिक स्तरावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. हा आव्हानात्मक काळ आहे. मात्र, भारताचे जागतिक संबंध असल्यामुळे या परिस्थितीचा भारत ठामपणे सामना करेल. सर्व देशवासियांनी एकत्र येऊन या संकटातून बाहेर पडावे.
टीका करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पुढे पंतप्रधान मोदींनी राजकारण करणाऱ्यांवर आणि टीका करणाऱ्यांवर भाष्य केलं. हा 140 कोटी देशवासियांच्या हिताचा विषय आहे. यामध्ये स्वार्थी राजकारणाला कोणतेही स्थान नाही, असं पतंप्रधान मोदी म्हणाले.
अनेक लोक देशात अफवा पसरवत आहेत. अफवा पसरवणारे आपल्या देशाचं नुकसान करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकार जी अधिकृत माहिती देईल त्यावरच विश्वास ठेवावा, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी खाद्यतेलाचा 10 टक्के कमी वापर करण्याचा सल्ला दिला. सोबतच साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. तसेच आंतरराष्ट्रीय योद दिन जवळ आला असून या दिनाची तयारी करावी, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले आहे.












