Raj Thackeray On Sharad Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल (19 मार्च) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) गुढी पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) पार पडला. राज ठाकरेंच्या या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. तर या मेळाव्यात भाषणादरम्यान राज ठाकरेंचा अनपेक्षित सूर सर्वांना दिसून आला. आत्तापर्यंतच्या अनेक भाषणांमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. मात्र, यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांवर कसलीही टीका न करता त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठणावर बंदी; मुस्लिम देशाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी महान व्यक्तींच्या नावाच्या यादीत शरद पवारांच्या नावाचा केला उल्लेख
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शरद पवारांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच बारामतीच्या विकासाबाबतही त्यांनी भाष्य केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तींच्या नावाच्या यादीत शरद पवारांच्या नावाचा समावेश केला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सर्व संत आणि थोर समाजसुधारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक नावांच्या यादीत राज ठाकरेंनी शरद पवारांचे नाव घेतले.
शरद पवारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?
शरद पवारांचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की, आपण रस्त्यावर अनेक प्रकारची फळे पाहतो. ही फळे पूर्वी आपल्याला पाहायला देखील मिळत नव्हती. पण, आज ती फळे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. शरद पवारांनी राज्यात फलोत्पादन क्षेत्रात सर्वात मोठी क्रांती केली आहे, त्यामुळेच आज आपल्याला महाराष्ट्रात जी फळे दिसत नव्हती ती मिळायला लागली आहेत. जरी राजकीय मतभेद असले तरी या शरद पवारांच्या या कार्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बारामतीचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी बारामतीमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांनी बारामतीच्या शेती क्षेत्रात एआय (AI) अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणून मोठी क्रांती केली आहे. शरद पवारांनी हे तंत्रज्ञान आणल्यामुळे बारामतीमधील शेतीचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे सर्वांनी बारामतीला एकदा जाऊन हे प्रयोग नक्की बघावेत, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती कशाप्रकारे आधुनिक करता येते, याचे उत्तम उदाहरण शरद पवारांनी सेट केले असल्याचेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. अशाप्रकारे राज ठाकरेंनी शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांचं कौतुक केल्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.












