शिक्षकांच्या जाचाला कंटाळून सांगलीच्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यांने दिल्ली आत्महत्या केल्याने राज्यासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. आता या आत्महत्येवर शौर्याचे वडीलांनी मोठी माहिती दिली आहे. माझा मुलगा प्रचंड संवेदनशील होता. शाळेच्या अभ्यासातही बरा होता. त्याला एक्स्ट्रा करिक्युलम एॅक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे त्याला डान्स, मिमिक्री आणि इतर एॅक्टिव्हिटीज मध्ये विशेष रस होता, पण हाच गुण त्याच्या मुळावर आल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शाळेतील चार-चार शिक्षिकांनी केवळ शाळेत मिमिक्री करतो म्हणून त्याला वारंवार टाॅर्चर केलं. याबद्दल तो आमच्या बोलायचा, मला या शाळेत ठेवू नका, पण आम्ही चार-आठ दिवस कळ काढ, असं त्याला बजावलं होतं, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथी मूळचे प्रदीप पाटील यांचे कुटुंब दिल्लीत राजीवनगर भागात सोने-चांदीचा गलाईचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा तिथे सेंट कोलंबस शाळेत सीबीएसई अभ्याक्रमाच्या दहावी इयत्तेत शिकत होता. तेथील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅट फॉर्म क्रमांक २ वरून खाली उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुईसाईट नोट लिहिली असून शाळेतील शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे शौर्यने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्यचे वडील प्रदीप हे आई आजारी आहे, म्हणून गावी ढवळेश्वरला आले होते. या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्लीला गेले. त्यानंतर आज गुरुवारी एअर अॅम्ब्युलन्सने शौर्यचे पार्थिव ढवळेश्वरला आणण्यात आले.
खासदार निलेश लंके यांची शाळा आणि शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी
सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली च्या राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी संबंधित शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून दिल्लीतील संबंधित शाळेवर आणि शिक्षकांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी केली आहे.












