Bihar Election : बिहार निवडणुकीत मतदानानंतर सर्वांच्या नजरा आज (14 नोव्हेंबर) होणाऱ्या मतमोजणीवर खिळल्या आहेत. मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील 46 मतमोजणी केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतांची मोजणी सुरू झाली आहे. मोजणी सुरू झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर निवडणूक निकालाचे कल समोर येऊ लागतील. 243 जागांसाठी मतमोजणी निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
मतमोजणी स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था
ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी कक्षात 14 टेबल आणि एक दुसरे टेबल ठेवण्यात आलं आहे. 14 टेबलांवर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाईल. मतमोजणीच्या दिवशी उमेदवार, निवडणूक एजंट आणि केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत व्हिडिओग्राफी केल्यानंतर स्ट्राँग रूम उघडलं जाईल. त्यानंतर मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी स्थळी मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी आणि विजय मिरवणुकीलाही मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संध्याकाळी उशिरापर्यंत जाहीर निकाल जाहीर होणार
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 38 जिल्ह्यांमधील एकूण 46 मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीत 7.45 कोटी मतदार 2,616 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. आयोगाच्या निवेदनानुसार, आयोगाच्या निवेदनानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स अत्यंत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आणि सर्व 243 जागांचे निकाल संध्याकाळी उशिरापर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार की तेजस्वी यादव कोण मारणार बाजी?
दरम्यान, गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या मतमोजणीच्या रणनीतींवर चर्चा केली. राज्यातील सर्वांच्या नजरा नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? याकडे लागल्या आहेत. तर महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की, महाआघाडी 160 हून अधिक जागा जिंकेल.
एनडीए आणि महाआघाडीतील पक्ष
एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांचा समावेश आहे. महाआघाडीमध्ये आरजेडी, काँग्रेस, डावे पक्ष, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) आणि इंडियन इन्क्लूसिव्ह पार्टी (आयआयपी) यांचा समावेश आहे. दोन्ही आघाड्यांकडून मैदानात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा, राजदचे तेजस्वी यादव आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश कुमार यांचा समावेश आहे.












