Farmer Destroys Onion Crop Due to Low Prices : राज्यात कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे. बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत नसल्याने आणि साठवणुकीअभावी मोठ्या प्रमाणात कांदा सडत असल्याने शेतकऱ्यांवर अक्षरशः कष्टाने पिकवलेलं पीक नष्ट करण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यांतील अनेक शेतकरी स्वतःच आपल्या शेतात उभ्या कांद्यावर रोटावेटर फिरवत असल्याचं विदारक वास्तव समोर येत आहे.
हेही वाचा – गुलाबांना ‘व्हॅलेंटाइन डे निमित्त’ आंतरराष्ट्रीय मागणी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा
कांदा उत्पादनासाठी बी-बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतूक यावर हजारो रुपये खर्च करूनही सध्या बाजारात कांद्याला उत्पादन खर्चही निघत नाही. काही ठिकाणी प्रतिक्विंटल ५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने कांदा विक्रीसाठी नेण्यापेक्षा शेतातच नष्ट करणे अथवा जनावरांना खायला लावणे शेतकऱ्यांना परवडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कांद्याची साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदामे, कोल्ड स्टोरेजची सुविधा नसल्याने कांदा काही दिवसांतच सडतो. शासनाकडून हमीभाव, भाव स्थिरीकरण निधी, निर्यात धोरण याबाबत केवळ घोषणा होत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. “एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा नष्ट करताना काळजाला चटका बसतो. पण बाजारात नेला तरी नुकसानच पदरी पडतं,” अशी व्यथा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातत्याने अशी परिस्थिती येत असल्याने पुढील हंगामात कांदा पिकवायचा की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या गंभीर संकटावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. कांद्याला किमान आधारभूत दर, तातडीची खरेदी व्यवस्था, साठवणूक सुविधा आणि निर्यात धोरणात सुस्पष्टता आणावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीतून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही मूक वेदना सरकारपर्यंत कधी पोहोचणार? आणि शेतकऱ्यांच्या कष्टांना कधी न्याय मिळणार? असा सवाल आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.









