US-Israel-Iran War | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्धामुळे (War) भारताला (India) अनेक परिणामांना सामोरं जावं लागत आहे. आधीच गॅस, तेल आणि इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम साखर कारखान्यांवरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांवर नवीन वर्ष अर्थातच गुढीपाडवा हा सण येऊन ठेपला असून या काळात साखर महाग झाली आहे. साखरेसोबतच इतर दैनंदिन वस्तू देखील महाग झाल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
गुढीपाडव्याला साखर गाठी महाग होणार?
गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राचं नवीन वर्ष. या खास सणादिवशी साखर गाठीला फार मोठे महत्त्व असते. गुढीपाडव्याला साखर गाठीचा हार घालून गुढीची पूजा केली जाते. मात्र, आता साखर महाग झाल्यामुळे या साखर गाठीच्या हाराच्या किंमतींमध्येही 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन नवीन वर्षात आणि गुढीपाडवा सण जवळ आला असतानाच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.
युद्धाचा परिणाम साखर उद्योगावर
मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम साखर उद्योगावर झाल्याचं दिसून येत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून साखर कारखान्यांना केंद्र सरकराने दिलेला निर्यात कोटा आता ठप्प होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे आता साखरेची निर्यात थांबल्यामुळे बाजारामध्ये साखरेचे आवक वाढली आहे. साखरेची आवक वाढल्यामुळे साखरेचे दरही घसरले आहेत. 3700 रूपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता 3200 रूपयांनी विकली जात आहे. याचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. तसेच युद्धामुळे साखरेची निर्यात थांबली असून साखर कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात साखर गाठी सोबत एलपीजी गॅसच्या दरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यपूर्वेती युद्धामुळे भारतातील एलपीजी सिलिंडर गॅसचे दर 50 ते 60 रूपयांनी वाढले आहेत. अशातच आता गॅस सिलिंडर रीफील करण्याचे नियमही बदलण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आता पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर हा 21 दिवसांनंतर मिळणार आहे. हे नवीन नियम कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केले आहेत. गॅस, साखरेसोबतच इतर कच्च्या मालाच्या दरातही दुप्पट-तिप्पट पटीने वाढ करण्यात आली.
दुसरीकडे, फळं, भाजीपाल्याचे दर स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. युद्धामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2200 वरून 1200 रूपये एवढी घसरण केळीच्या दरात झाली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच भाजीपाला देखील स्वस्त झाला आहे. निर्यातीत घट झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.












