Captain Virendra Vishwakarma : अंगावर काटा आणणारी हि व्यथा आहे, युद्धात एका विशाल जहाजावर अडकलेल्या मुंबईतल्या एका कॅप्टनची… अमेरिका, ईस्त्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईच्या दहिसरमध्ये राहणारा कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हा आपल्या 30-35 जणांच्या क्रू मेंबरसह युद्धसदृश परिस्थितीत एका महाकाय जहाजावर अडकला आहे… भारतासाठी महत्त्वाचं असलेलं एलपीजी घेऊन जाणारं हे जहाज आहे… कल्पना करा, समुद्राच्या मध्यभागी एक मोठं जहाज उभं आहे… आजूबाजूला सायरनचा आवाज होतोय आणि आकाशात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची हालचाल सुरूय… अशामध्ये विश्वकर्मा हा जहाजावरून सुखरूप बाहेर येण्यासाठी धडपडतोय… नक्की तो कुठे आणि कसा अडकलाय, तो आणि त्याचे साथीदार कसे बाहेर येणार हे या बातमीच्या माध्यमातून पाहू..
गॅसची चिंता मिटली! भांडं उलटं, गटारात पाईप, मोदी ‘जुगाड’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…
मुंबईत राहणारे कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा हे भारतासाठी एलपीजी टँकर वाहून नेणाऱ्या जहाजाचे कॅप्टन आहेत. हे जहाज मोठ्या प्रमाणात LPG वाहून नेत आहे. या जहाजावर असलेला गॅस इतका मोठ्या प्रमाणात आहे की त्यातून सुमारे ३.६ दशलक्ष LPG सिलिंडर भरता येऊ शकतात. हे जहाज कुवेतमधील मीना अल अहमदी बंदरातून निघालं होतं आणि गुजरातमधील कांडला बंदराकडे येत होतं. पण दरम्यान मध्यपूर्वेत तणाव वाढला. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आणि त्यात अमेरिकेनं घेतलेली लढाईची भूमिका, यामुळे अनेक सागरी मार्गांवर सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, याच कारणामुळे अनेक जहाजांना थांबवण्यात आलं.
युद्धाच्या तणावामुळे २०० पेक्षा जास्त जहाजं अडकली
जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी, जगातील जवळपास २० टक्के तेल आणि गॅस याच मार्गाने जातं. मात्र युद्धाच्या तणावामुळे २०० पेक्षा जास्त जहाजं या भागात अडकली आहेत. कॅप्टन विश्वकर्मा यांचं जहाजही UAE मधील रास अल खैमाह जवळच्या मीना सकर बंदरात अडकवून ठेवण्यात आलं आहे. जहाज पुढे जाऊ शकत नाही… आणि मागेही फिरू शकत नाही. म्हणजेच संपूर्ण क्रू मेंबर्स सध्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडलेत. स्वतः कॅप्टन विश्वकर्मा यांनी आपली आपबिती सांगितलीय…
कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा यांनी सांगितली आपबिती
“आमच्या डोळ्यांसमोर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन उडत आहेत. सायरन सतत वाजत असतात. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. या जहाजावर मोठ्या प्रमाणात LPG गॅस असल्यामुळे धोका आणखी मोठा आहे. सध्या जहाजावर सुमारे ६० दिवस पुरेल ईतका अन्नसाठा आहे, आणि कंपनीने आम्हाल आश्वासन दिलं आहे की नौदल आणि संबंधित मंत्रालयांशी संपर्क करून बचावाची व्यवस्था केली जात आहे. सध्या आम्ही नौदलाच्या ताफ्याची वाट पाहत आहोत”.
विश्वकर्मा यांच्या पत्नीची वाढलीय धाकधुक
दरम्यान मुंबईतील त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. कॅप्टन विश्वकर्मा यांची पत्नी निल्पा विश्वकर्मा दहिसरमध्ये दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा मुलगा वेदांश १० वर्षांचा आणि मुलगी निर्वी १२ वर्षांची आहे. “मी गेल्या काही दिवसांपासून झोपलेली नाही. आम्ही रोज व्हिडिओ कॉलवर बोलतो. पण जहाजावरचं इंटरनेटही कधी कधी बंद पडतं, तेव्हा धाकधुक वाढते अशी प्रतिक्रीया विश्वकर्मा यांच्या पत्नीनं दिलीय.
भारत सरकार आणि नौदलाच्या संभाव्य बचाव मोहिमेकडे लक्ष
होर्मुझ सामुद्रधुनीतील हा तणाव फक्त एका जहाजाचा प्रश्न नाही, तर जगाला होणारा ऊर्जा पुरवठा, समुद्री व्यापार आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे भारत सरकार आणि नौदलाच्या संभाव्य बचाव मोहिमेकडे आता सर्वांच्या नजरा आहेत… कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा आणि त्यांच्या क्रूला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी काय पावले उचलली जातील… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.







