Nashik TCS Case: नाशिकमध्ये TCS शाखेत घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून काही कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात दाखल झालेल्या FIR मधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
नाशिकमधील एका नामांकित कंपनीच्या शाखेत घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून आरोपींची कार्यपद्धती (modus operandi) FIR मधून स्पष्ट झाली आहे. सध्या या प्रकरणाचा विशेष तपस पथक कसून तपास करत असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
हेही वाचा: MPSC नंतरही करिअर थांबणार नाही! ‘निपुण सेतू’ उपक्रमाची घोषणा; नेमका काय आहे? पाहा एका क्लिकवर
TCS कंपनीच्या शाखेत
मिळलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील TCS कंपनीच्या शाखेत घडलेल्या घटनांमुळे देशभरात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर काही कर्मचारी आणि एका HR अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. एकूण ८ महिला आणि १ पुरुष कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर आतापर्यंत ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारींमधून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केल्याचे उघड झाले आहे. कामाच्या वेळेनंतरही कार्यालयात थांबून संशयास्पद हालचाली करणे, कंपनीच्या संसाधनांचा गैरवापर करणे तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून योजना आखणे, अशा पद्धतीने ही मोहीम राबवली जात असल्याचा आरोप आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, काही आरोपी कामानंतरही ऑफिसमध्ये थांबून काम करत असल्याचे भासवत होते आणि त्याच दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात होता.
धर्मांतरासाठी दबाव
या प्रकरणातील पहिली तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामध्ये एका २५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. या प्रकरणात दोन पुरुष सहकारी आणि एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, कामाच्या ठिकाणी अयोग्य वर्तन, वैयक्तिक आयुष्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी तसेच मानसिक छळ केल्याचे आरोप आहेत.
पीडितेने वारंवार आपल्या टीम लीडरकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला आहे. उलट काही प्रकरणांमध्ये आरोपींना पाठिंबा दिला गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे.











