Rohit Pawar warning to Bageshwar Baba : बागेश्वर बाबा नावाचा भोंदू कुठेही जातो, काहीही बोलतो आणि वाद पेटवतो, अलिकडेच महाराष्ट्रात येऊन या बाबानं शिवरांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि पुन्हा जोरदार राजकारण पेटलं, शिवराय थकले होते, त्यांनी समर्थ रामदासांकडे राजपाट सांभळण्याची विनंती केली, असं वादग्रस्त आणि बिनबुडाचं वक्तव्य या भोंदूनं केलं, विशेष म्हणजे त्याच मंचावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते, त्यांनी बागेश्वरला हे बोलताना विरोध केला नाही, मात्र नंतर टीकेची झोड उटल्यानंतर आता भाजपाकडून सारवासारव सुरू आहे, त्यातच आता या बागेश्वर बाबाविरोधात रोहित पवारही पेटून उठले आहेत, त्यांनी आपल्या पोस्टमधून बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतालाय, तसेच बागेश्वरला कडकडीत इशाराही दिलाय…दोन पोस्ट करत रोहित पवार यांनी म्हटलंय.
‘भोंदू’ बाबावर कायमची बंदी घालण्याचे आवाहन
महाराष्ट्र ही संतांची आणि विचारांची भूमी आहे. या मातीत महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर धामचा धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्यावर सडकून टीका केली आहे. धीरेंद्र शास्त्री याने छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास आणि महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा समाचार घेताना रोहित पवारांनी सरकारला या ‘भोंदू’ बाबावर कायमची बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
धीरेंद्र शास्त्री याच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धीरेंद्र शास्त्री याच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, “काही लोकांची ही एक प्रवृत्तीच बनली आहे की, आधी जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्ये करायची, खोटा इतिहास सांगायचा आणि जेव्हा जनतेचा रोष समोर येतो, तेव्हा माफी मागायची. धीरेंद्र शास्त्री ही देखील अशीच एक प्रवृत्ती आहे. त्यांनी केवळ एकदाच नाही, तर वारंवार आपल्या महापुरुषांचा अपमान केला आहे. पूर्वी संत तुकोबारायांबद्दल अनुद्गार काढले आणि आता छत्रपती शिवराय तसेच महिलांचा अपमान करण्याचे धाडस त्यांनी केले आहे.”
“माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले” – शास्त्री
रोहित पवार पुढे म्हणाले की, जेव्हा चहुबाजूने टीका होऊ लागते, तेव्हा “माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले” असे म्हणून हे लोक हात झटकतात. मीडियाने त्यांचे बोलणे जसेच्या तसे दाखवले असतानाही, माफी मागताना आपल्या विधानावर कोणतेही ठोस स्पष्टीकरण न देता केवळ वेळ मारून नेण्याचे काम शास्त्रीने केले आहे. त्याची ही माफी अत्यंत पोकळ असल्याचे पवारांनी नमूद केले.
रोहित पवारांनी थेट सत्ताधारी पक्षाला लक्ष्य
दुसऱ्या एका आक्रमक पोस्टमध्ये रोहित पवारांनी थेट सत्ताधारी पक्षाला म्हणजेच भाजपला लक्ष्य केले. “सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने या भोंदूचा निषेध केला आहे. मग या मोठ्या पक्षाला महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा आणि महामानवांपेक्षा हा भोंदू बाबा मोठा वाटतो का?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, या बाबाचे नागपूरसह इतर ठिकाणचे कार्यक्रम सत्तेतील मोठ्या पक्षाकडूनच स्पॉन्सर केले जात आहेत. जर हे खरे असेल, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा आधार
महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना इशारा देताना पवारांनी संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा आधार घेतला. ते म्हणाले, “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि इथे संतांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण जर संत असल्याचा आव आणून कुणी पाखंडी इथल्या महापुरुषांचा अपमान करणार असेल, तर त्यांना संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ याचा प्रत्यय महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही.”
महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा कोणीही मोठे नाही
नागपुरात धीरेंद्र शास्त्री याचा कार्यक्रम अद्यापही सुरू असल्याबद्दल पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा कोणीही मोठे नाही, हे सरकारने सिद्ध करून दाखवावे. या भोंदू बाबाचा कार्यक्रम तातडीने बंद करावा आणि भविष्यात अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात पाय ठेवण्यास कायमची बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी पक्ष यावर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतूनही या वादाचे पडसाद उमटत असून सामान्यांमध्येही तीव्र संताप पाहायला मिळत आहे.












