KDMC Demolition Notice: डोंबिवलीत Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) ने मोठी कारवाई करत ३५ वर्षांपूर्वी बांधलेली एक इमारत बेकायदेशीर ठरवली असून ती तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तब्बल २९ कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील श्यामा प्रसाद मुखर्जी रोडजवळील ‘भावना इमारत’ ही बेकायदेशीर बांधकाम असल्याचा दावा करत महापालिकेने ती पडण्याची नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये मोठा संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२००२ पासून सुरू आहे वाद
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या इमारतीबाबत २००२ मध्येही पाडकामाची नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली होती.
मात्र नंतर काही कायदेशीर प्रक्रिया बदलल्यानंतर ही स्थगिती रद्द झाल्याचे मानले गेले आणि आता पुन्हा एकदा KDMC ने कारवाई सुरू केली आहे.
“आम्ही कुठे जायचं?” रहिवाशांचा प्रश्न
29 कुटुंबांना अचानक घर खाली करण्याची नोटीस मिळाल्याने रहिवाशांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. काही कुटुंबांमध्ये वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिला असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर घर सोडावे लागणार असल्याने रहिवाशांनी प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी केली आहे.
KDMCचा गंभीर दावा
महापालिकेच्या मते, इमारत बांधकाम नियमांचे पालन न करता उभारण्यात आली असून सध्याच्या घडीला कोणतीही न्यायालयीन स्थगिती लागू नाही.
त्यामुळे रहिवाशांना 15 दिवसांत इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वीज-पाणी तोडण्याचा इशारा
नोटिशीनुसार, दिलेल्या मुदतीत इमारत रिकामी न केल्यास वीज आणि पाणी पुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पाडकाम करण्यात येणार आहे.
तसेच पाडकामाचा खर्चही रहिवाशांकडून वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रहिवाशांसमोर मोठे संकट
35 वर्षांपासून राहात असलेल्या घरांवर कारवाई होणार असल्याने भावना इमारतीतील कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अचानक आलेल्या या निर्णयामुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.




