Adhik Maas 2026: यंदा अधिक मास हा १७ मे २०२६ ते 15 जून २०२६ दरम्यान येत असून या काळात धार्मिक कार्यांना विशेष महत्व असते. जाणून घ्या या महिन्याचे महत्व, नियम आणि करावयाचे उपाय
हिंदू धर्मात अधिकमासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी कालावधी मानले जाते. पंचांगातील तिथी आणि ग्रहांच्या गणनेतील फरक संतुलित करण्यासाठी हा अतिरिक्त महिना येतो. यंदा २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने अधिकमास पाळला जाणार आहे. या काळात भगवान विष्णूंची उपासना, दानधर्म आणि सात्विक जीवनशैली विशेष महत्व दिले जाते.
हेही वाचा: अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६ कोटींचा फटका; BMC अधिकाऱ्यासह अनेक जणांना ठोकल्या बेड्या
अधिकमास (Adhik Maas) म्हणजे काय?
सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यामध्ये दरवर्षी काही दिवसांचा फरक पडतो. सौर वर्ष साधारण ३६५ दिवसांचे असते, तर चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे मानले जाते. या फरकाची भरपाई करण्यासाठी साधारण तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिकमास म्हटले जाते. त्यामुळे त्या वर्षात १२ ऐवजी १३ महिने होतात.
यंदा कधी आहे अधिकमास
यंदा अधिकमासाची सुरुवात १७ मे २०२६ रोजी होणार असून त्याचा समारोप १५ जून २०२६ रोजी होणार आहे. या कालावधीत दोन ज्येष्ठ महिने येणार आहेत. अधिकमासामुळे काही सणांच्या तारखांमध्ये बदल होणार असून अनेक धार्मिक कार्यक्रम पुढे ढकलले जातात.
काय आहे अधिकमासाचे विशेष धार्मिक महत्व
अधिकमास भगवान विष्णूंना (Lord Vishnu) समर्पित मानला जातो. या महिन्यात विष्णूंची पूजा, मंत्रजप, व्रत आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेली भक्ती आणि दान अनेक पटींनी फलदायी ठरते. त्यामुळे अनेक भक्त या महिन्यात उपवास, जप आणि सत्संग यांना प्राधान्य देतात.
अधिकमासात कोणते नियम पाळावेत?
सात्विक आणि साधा आहार घ्यावा
भगवान विष्णूंच्या नामस्मरणावर भर द्यावा
शक्य असल्यास उपवास किंवा फलहार करावा
दानधर्म आणि गरजूंना मदत करावी
मन, वाणी आणि वर्तनात संयम ठेवावा
राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे
अधिकमासात काय टाळावे?
धार्मिक परंपरेनुसार अधिकमासात शुभ आणि मंगल कार्ये टाळली जातात. या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे योग्य मानले जात नाही. तसेच मांसाहार, मद्यपान आणि तामसिक आहार टाळण्याचा सल्ला दिला जातो.
अधिकमास हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आत्मशुद्धी, संयम आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा कालावधी मानला जातो. त्यामुळे या महिन्यात सकारात्मक विचार आणि भक्तीभाव ठेवणे विशेष लाभदायक मानले जाते.











