Mumbai Jain Marathi Controversy : मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी सार्वजनिक रस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्याच्या मुद्द्यावरून मराठी आणि जैन समुदायांमध्ये तीव्र वाद पेटला आहे. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास एवेन्यू सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद आता दादरपर्यंत पोहोचला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिकेला पट्ट्या हटवाव्या लागल्या आहेत.
जैन धर्मातील साधू-साध्वी अनवाणी फिरतात. उन्हाळ्यात रस्त्यावरील उष्णता, पावसाळ्यात काई किंवा जीव-जंतू यांचे रक्षण व्हावे म्हणून काही जैन अनुयायांनी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या. घाटकोपरमधील सोसायटीत ही पट्टी प्रथम चर्चेत आली. सोशल मीडियावर युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी याला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ म्हणत आक्षेप घेतला. त्यांच्या पोस्टनंतर मुद्दा व्हायरल झाला.
मनसेची आक्रमक प्रतिक्रिया आणि आरोप
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. “कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही. धर्म सांगतो म्हणून मल-मूत्र रस्त्यावर टाकणार का? महाराष्ट्रात धर्माचं नाटक चालणार नाही, मराठी माणसाचं चालणार,” असे ते म्हणाले. दादरमध्ये गोखले मार्गावर जनसंपर्क दौऱ्यावेळी त्यांनी ३ पर्यंत पट्ट्या न हटवल्यास ‘मनसे स्टाईल’ कारवाईचा इशारा दिला. दादरमध्ये जैन धर्मगुरुंशी महिलांमध्ये झालेल्या वादावादीचे व्हिडिओही व्हायरल झाले. महिलांनी “तुमच्या धर्मात महिलांशी असं वागायचं शिकवतात का? बाथरूम नसलेले, पाणी रस्त्यावर टाकणारे” असे आरोप केले. जैन धर्मगुरुंचा आवाज चढला असल्याचेही दिसले.
मनसेचा इशारा, पालिकेची तातडी कारवाई
मनसेच्या अल्टिमेटम नंतर महापालिका आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दादरमधील डी.एस. बाबरेकर रोड, शिवतीर्थ परिसरातील पट्ट्या सकाळी हटवण्यात आल्या. यामुळे तात्पुरते शांतता प्रस्थापित झाली आहे. जैन समाजाकडून याला ‘धार्मिक स्वातंत्र्य आणि अहिंसा’ चे संरक्षण म्हणून पाठिंबा मिळाला. काही जैन मुनींनी प्रसाद वेदपाठक यांच्या विधानांवर टीका केली. दुसरीकडे मराठी एकीकरण समिती आणि स्थानिक रहिवाश्यांनी ‘सार्वजनिक जागा धर्मासाठी वापरणे’ अयोग्य असल्याचे सांगितले. काही ठिकाणी ‘जैन जिहाद’ असे शब्दही वापरले गेले, ज्यामुळे तणाव वाढला.
मागील पार्श्वभूमी आणि सध्याची परिस्थिती
हा वाद नवीन नाही. यापूर्वी दादर कबुतरखाना प्रकरणातही जैन-मराठी तणाव दिसला होता. मुंबईत विविध समुदायांची घनता असल्याने असे मुद्दे सहज राजकीय रंग घेतात. मनसेने ‘मराठी माणसाचा पहिला हक्क’ चा मुद्दा उपस्थित केला आहे. पालिकेने पट्ट्या हटवल्याने तात्कालिक शांतता आहे, पण सोशल मीडियावर चर्चा कायम आहे. दोन्ही बाजूंनी संयम राखण्याची गरज आहे. महापालिकेने अशा प्रकारच्या धार्मिक चिन्हांकनांबाबत स्पष्ट धोरण तयार करावे, अशी मागणी होत आहे. हा वाद केवळ एक पट्टीचा नसून, मुंबईतील स्थानिक बनाम बाहेरील, धार्मिक स्वातंत्र्य बनाम सार्वजनिक जागा यांचा आहे. शांतता आणि समन्वय राखत तो सोडवणे आवश्यक आहे.












