Beed Vilas Ghule Case: बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनांनी हादरलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता विलास घुले प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी गावामध्ये विलास घुलेची हत्या करण्यात आली. केवळ दुसऱ्याचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या विलास घुलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली. अन् या घटनेनंतर संपूर्ण केज तालुका आणि टाकळी गावात तीव्र संतापाची लाट उसळली.. संतप्त गावकऱ्यांनी अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. पण याप्रकरणाला आता वेगळंच वळण लागताना दिसत आहे.
हेही वाचा: फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; मराठी नेता पंतप्रधान झाला तर…
या प्रकरणात खासदार पूत्र सौरभचे नाव समोर आले. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले होते. या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रीपद देखील गेले. आता घुले प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे चांगलेच अडचणीत सापडले आहे..या नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत असतानाच आता या प्रकरणात एक महिला समोर आली आहे.
ब्लॅकमेल करत अत्याचार
विलास घुलेचा मित्र उमेश मानेने व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केला असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. 3 तारखेला विलास घुले म्हणाला होता की, संबंध न ठेवल्यास तुझ्या लेकरांना किंवा तुझ्या नवऱ्याला मारून टाकू, यानंतर 20 तारखेला देखील घरासमोर येऊन हॉर्न मारून शिवीगाळ केली… त्याला समजावण्यासाठी माझे वडील, नवरा आणि नातेवाईक तेथे गेले होते. तेव्हा त्यांनी काचेच्या बॉटल आणि विटांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर माझ्या वडिलांनी हात उचलला आणि यातून ही घटना घडली.
महिलेचा खळबळजनक दावा
रमेश घुलेने आम्हाला धमकावल्याने आम्ही आजपर्यंत पोलिसात गेलो नाही, पोलिसांनी माझी तक्रार घेऊन आम्हाला न्याय द्यावा. उमेश मानेने माझ्यासोबत बळजबरी केली, अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ केले. व्हिडिओ व्हायरल करीन असे म्हणून ब्लॅकमेल केले आणि पुन्हा अत्याचार केला. ही घटना मी घरच्यांना सांगितली, पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाणार होतो…रमेश घुलेने आम्हाला धमकावले, यापुढे असे होणार नाही याची जिम्मेदारी त्याने घेतली आणि जर तक्रार द्यायला गेलात तर तुमचं काही खरं नाही असं म्हणाला. आम्ही शेतात राहत होतो, त्यानंतर गावात राहायला गेलोत. त्यानंतरही उमेश माने आणि विलास घुले बुलेट आणि चार चाकी काळ्या स्कॉर्पिओने येऊन त्रास द्यायचे, असंंही महिलेने म्हटले आहे.











