Kopargaon Sand Mafia Attack : कोपरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा हैदोस सुरू असून, प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही की काय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदी पात्रातून सर्रास सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी वरिष्ठ पातळीवर निवेदन देत वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके वर काढले असून अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे.
वाळू माफियांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही
विशेष म्हणजे, वाळू माफियांना नेमकं कोणाचं अभय आहे? असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. वाळू माफिया आणि तहसील प्रशासन यांच्यात साटेलोटे आहे की काय, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. वाळू माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतरही वाळू माफियांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यानंतर काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तहसीलचे पथक माहेगाव देशमुख परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीला त्रास, आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्यात आला
यावेळी पथकातील कर्मचारी व वाहन चालक मोबाईलवर चित्रीकरण करत असताना काही वाळू माफियांनी त्यांना अडवून धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच मोबाईल हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी अधिक माहिती दिली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले
वाळू माफिया आता थेट शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करत असल्याने, यांच्यावर नेमका अंकुश कोण घालणार? तहसील प्रशासन व वरिष्ठ अधिकारी ठोस उपाययोजना करतील का? गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा थांबेल का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. दरम्यान, काल आमदार आशुतोष काळे यांनी प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार महेश सावंत यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावल्याची माहिती आहे. मात्र आता तरी तहसील यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी ठोस कारवाई करतील का? कोपरगाव तालुक्यातील वाळू माफिया संपणार का? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.












