Natepute occult incident : शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत काळ्या बाहुल्या, नारळ, सुया, लिंबू, दारूच्या बाटल्या आणि काही व्यक्तींचे फोटो अशी सामग्री गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आढळत आहे. रात्रीच्या वेळी चितेजवळ अघोरी कृती केल्याची चिन्हे सापडत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. काही ठिकाणी कोंबडीचे अवशेष, भावल्या, कवळ आणि इतर विचित्र साहित्य आढळत असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे येथे कोणीतरी जादूटोण्याचे प्रकार करत असल्याची चर्चा पसरली आहे. याशिवाय स्मशानभूमीत जळलेल्या चितेचे काही अवशेषही गायब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या अवशेषांच्या गायब होण्यामुळे परिसरातील संशय आणखी वाढला आहे.
हे ही वाचा : कायद्याचा धाक संपला? न्यायालयच्या पार्किंगमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
नागरिकांनी वारंवार प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने नाराजी वाढली आहे. वाढत्या असुरक्षिततेमुळे स्थानिकांनी तातडीची कारवाई आणि नियंत्रण उपाययोजनांची मागणी पुन्हा केली आहे. रहिवाशांनी स्मशानभूमीत नियमित पोलीस गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली आहे. तसेच घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
कायद्यातील तरतूद आणि अंधश्रद्धा निर्मूलन
महाराष्ट्रात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे. या कायद्यानुसार भोंदूपणा, अघोरी विधी, जादूटोणा किंवा सार्वजनिक जागी तांत्रिक कृती करणे दंडनीय अपराध आहे. स्मशानभूमीत रात्री अशा प्रकारचे विधी करणे कायद्याच्या विरोधात असून दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे या घटनांवर त्वरित कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.












