Open Food Sale Threatens Public Health in Murtizapur : अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील शहर बाजारपेठेत उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्या हातगाडीधारक दुकानदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. वक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. या खाद्य अनेक ठिकाणी उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर जाळी, काचेचे बॉक्स किंवा कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. बहुतांश खाद्य पदार्थ हे थेट हातगाडीवर उघड्यावर ठेवून विकले जात असून, त्यावर धूळ, माती व हवेत पसरणारे प्रदूषित कण साचत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हेही वाचा – नाशिकातील १०० वर्षे जुनी शाळा परस्पर विकली, शासन दप्तरी शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची नोंद
मूर्तिजापूर बाजारपेठ ही कायमच मोठ्या वाहनांच्या वर्दळीने गजबजलेली असते. सध्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने संपूर्ण बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा थेट परिणाम उघड्यावर ठेवलेल्या खाद्य पदार्थावर होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. आग्रा येथील प्रसिद्ध पेठा असल्याचे दाखवून स्थानिक स्तरावर घरीच बनवून त्या नावाने विकला जात असल्याची चर्चा आहे.
अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाच्या परवानग्या
जिलेबी, समोसा, कचोरी,भजे वडापाव व इतर अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ हे थेट रस्त्यावर हातगाडीवर विकले जात आहेत. यातील बहुतांश खाद्य पदार्थ हे घरगुती पातळीवर तयार करून थेट बाजारपेठेत आणले जात असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाच्या परवानग्या, अन्न चाचणी। अहवाल, प्रक्रिया, अन्नाची गुणवत्ता याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर धुळीचे कण, धूर व हवेतले प्रदूषक घटक थेट बसत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावर खाऊ विकणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करून त्यांना अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार नियम पाळण्यास सक्ती करावी, तसेच नियमित तपासणी व कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांकडून केली जात आहे
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
याकडे अन्न व औषध प्रशासन व नगर परिषद प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.












