Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील चौथा सामना शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला. या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाज पुर्णपणे अपयशी ठरले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघांचा पहिला डाव कमी धावसंख्येत संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात धावसंख्या बिनबाद 4 धावांवर होता. नाईटवॉचमन स्कॉट बोलँड 4 धावांवर आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद होता. ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 46 धावांवर होती. (Boxing Day Test)
124 वर्षांनंतर झाला विक्रम :
चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 20 फलंदाज बाद झाले, त्यापैकी सर्व जलद गोलंदाजांनी बाद केले. सुमारे 124 मध्ये पहिल्यांदाच अॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 20 किंवा त्याहून अधिक विकेट पडल्या. यापूर्वी, जानेवारी 1902 मध्ये, त्याच मैदानावर खेळाच्या पहिल्या दिवशी एकूण 25 विकेट पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गमावलेल्या विकेटची ही सर्वाधिक संख्या होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकाच दिवशी 20 किंवा त्याहून अधिक विकेट्स पडण्याची ही चौथी वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव स्वस्तात बाद :
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात फक्त 152 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून फक्त मायकेल नेसर (35 धावा) आणि उस्मान ख्वाजा (29 धावा) हे काहीकाळ क्रीजवर टिकू शकले. इंग्लिश जलदगती गोलंदाज जोश टोंगनं शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची फलंदाजीही अपयशी :
प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा पहिला डावही जास्त काळ टिकू शकला नाही आणि संघ 110 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या डावाच्या आधारे 42 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरी ब्रूकनं सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याच्याशिवाय गस अॅटकिन्सन (28 धावा) आणि कर्णधार बेन स्टोक्स (16 धावा) हे दुहेरी आकडी गाठणारे इतर दोन फलंदाज होते. मायकेल नेसरने चार विकेट्स घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडनं तीन विकेट्स घेतल्या.
कांगारुंनी जिंकली मालिका :
कांगारुंनी कसोटी मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे आणि अॅशेस मालिकाही कायम ठेवली आहे. दोन्ही संघांच्या फलंदाजीवरुन स्पष्ट होतं की पहिल्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व होतं आणि खेळपट्टीनं सुरुवातीपासूनच फलंदाजांना अडचणीत आणलं.












