मोहोळ म्हणजे राजन मालक, अन् राजन मालक म्हणजे मोहोळ हे समिकरण गेल्या ४० वर्षापासून सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी महत्त्वाच्या नेत्यापैकी एक नाव म्हणजे राजन पाटील. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषद नगराध्यपदाचा उमेदवारी अर्ज भरताना अनेक घडामोडी घडल्या आहेत. मात्र, राजन पालटाने निवडणूकीपूर्वीच बाजी मारली आहे. अनगर नगरपंचायतीमध्ये राजन मालकाने १७ पैकी १७ उमेदवार (नगरसेवक) म्हणून बिनविरोध निवडून आणले आहेत. त्यामुळे भाजपला निवडणुकीच्या आधीच विजयश्री प्राप्त झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर भाजप नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला आहे. १७ उमेदवार जरी निवडून आले असले तरी, अनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील (भाजप) आणि उज्वला थिटे राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सोलापूर आणि महाराष्ट्र राज्यात मोठे राजकीय नाट्य रंगले आहे.
हेही वाचा – 8व्यांदा राजीनामा, 10व्यांदा घेणार मुख्यमंत्री म्हणून शपथ! 20 वर्षांपासून बिहारचे सरदार नितीश कुमार
अनगरमध्ये राजन पाटलांची दहशत
नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, त्यांना अर्ज भरू दिला जात नव्हता, रस्त्यात ट्रॅक्टर लावून अडथळा केला, गाड्यांची तपासणी करून त्यांच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न झाला. असे आरोप त्यांनी केले. त्यांच्या मते “अनगरमध्ये राजन पाटलांची इतकी दहशत आहे की लोक उभं राहायलाही तयार होत नाहीत,” असं त्या म्हणाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने विजयाचा गुलाल उधळला. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले.
हा विजय म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमधील भाजपाच्या महाविजयाची नांदी आहे.
राजन पाटील आणि १७… pic.twitter.com/jkaM3RJAom
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) November 17, 2025
शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन जावे लागले
“निवडणूक होणारच आणि आम्ही व्यवस्थितरित्या अर्ज भरला आहे. उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यासाठी त्यांना शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन जावं लागलं”, अशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाहेरचं पार्सल आणून या ठिकाणी लादलं
“राजकीय मंडळींनी बाहेरचं पार्सल आणून या ठिकाणी त्यांचा गावाशी काही संबंध नाही. बाहेरचे माणसं आणून उमेदवारी देऊन निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला आहे. दोन तारखेला जनता जनार्दन दाखवेल, कुणाचं किती पाणी आहे. लोकमत आहे ते लोकशाही पद्धतीने दाखवेल. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीला आम्हाला सामोरे जायला काही कमी नाही”, असं राजन पाटील म्हणाले.
2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत.












