Electronic Payment : भारत आणि दक्षिण कोरिया आता चिप निर्मितीपासून ते जहाजबांधणीपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये भागीदार होतील. सोमवारी पंतप्रधान मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हा करार झाला. हा दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पेमेंट करार देखील आहे. या करारानुसार, दोन्ही देशांचे नागरिक आता भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान प्रवास करताना क्यूआर कोड वापरुन सहजपणे पेमेंट करु शकतील. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग म्हणाले, “भारत आणि दक्षिण कोरियानं इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जोडण्याबाबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. यामुळं दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशांना भेट देताना स्थानिक क्यूआर कोड प्रणाली वापरून पेमेंट करणं शक्य होईल. या पावलामुळं परस्पर प्रवास आणखी सोयीस्कर होईल.”
हेही वाचा : “भारत शांततेच्या बाजूने…”, मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
हैदराबाद हाऊस इथं झालेल्या या बैठकीदरम्यान, ली जे-म्युंग यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढला आणि एक वृक्षारोपणही केलं. भारत-दक्षिण कोरियाचे द्विपक्षीय आणि सामरिक संबंध अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.
भारत-दक्षिण कोरिया सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होणार :
जागतिक भू-राजकीय अशांतता आणि वाढत्या व्यापार अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि दक्षिण कोरियानं सोमवारी आपला सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) अधिक मजबूत करण्यासाठी औपचारिक वाटाघाटी सुरु करण्यास सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या जागतिक तणावाच्या काळात भारत आणि दक्षिण कोरिया मिळून शांतता आणि स्थिरतेचा एक मजबूत संदेश देत आहेत. त्यांनी सांगितलं की, इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र काम करण्याचा निर्धार केला आहे. मोदी म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भेटीनंतर, आम्ही आमच्या विश्वासार्ह सहकार्याचे रूपांतर एका भविष्यवेधी भागीदारीत करणार आहोत.”
चिप्सपासून जहाजबांधणीपर्यंत सर्वच क्षेत्रांतील प्रमुख भागीदार :
पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, 2010 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या (CEPA) अंमलबजावणीनंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना नवी गती मिळाली. ते म्हणाले, “चिप्सपासून जहाजांपर्यंत, प्रतिभेपासून तंत्रज्ञानापर्यंत, मनोरंजनापासून ऊर्जेपर्यंत, आम्ही सहकार्याच्या नवीन संधी शोधू.” मोदींनी यावर जोर दिला की दोन्ही देश सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिकच्या दिशेनं काम करत राहतील. ते म्हणाले, “आपल्या संयुक्त प्रयत्नांतून, आपण शांततापूर्ण, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या उभारणीत योगदान देत राहू.” या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर, महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, तसंच लोकांमधील संपर्क वाढवणं यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं.




