Junk Food : तुम्ही जंक फूड खाताय का, मग थोडं थांबा आणि हे ऐकाच… जे शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे, ज्या शरीराच्या जोरावर आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत, जे शरीर आपली ताकद आहे.. त्या शरीराची तुम्ही काळजी घेता का?.. जितकं तुम्ही तुमच्या मनाला जपता, तितकं शरीराला जपताय का?… हे प्रश्न स्वःतालाच विचारा.. एकदा स्वत:कडेच बघा.. कारण ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’ च्या अहवालातून जे समोर आलंय, ते हादरवून सोडणारं आहे. जाणून घेऊया या अहवालात नेमकं काय आहे..
खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम
भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचं समोर आलंय… ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’ मध्ये प्रसिद्ध ताज्या विश्लेषणानुसार, गेल्या तीन दशकांत भारतात स्तन कर्करोगाच्या रुग्णांमध्ये ५ पटींनी वाढ झाली आहे…पारंपरिक भारतीय आहार म्हणजेच ‘भाजी-पोळी’ सोडून पाश्चिमात्य ‘जंक फूड’ संस्कृती स्वीकारल्याने हा धोका ४७७ टक्क्यांनी वाढल्याचं वास्तव समोर आलंय.. अहवालानुसार, १९९० च्या तुलनेत २०२३ पर्यंत भारतात स्तन कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सध्या सुमारे २ लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असून, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
कर्करोगाची प्रकरणे वाढण्यामागची कारणे ?
खराब जीवनशैली – अनियमित दिनचर्या आणि आहारातील बदल
शारीरिक निष्क्रियता – व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून काम करणे
व्यसन – अमली पदार्थ सेवन आणि धूम्रपान
उशिरा मातृत्व – उशिरा लग्न आणि उशिरा होणारी मुले.
प्रक्रिया केलेले पदार्थ – जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि रेड मीटचे अतिसेवन.
लठ्ठपणा : वाढते वजन आणि चरबी.
नियंत्रण आणलं नाही तर २०५० पर्यंत ही स्थिती गंभीर
कॅन्सरचं नाव ऐकताचं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. हा आजार केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. खासकरून महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. जर यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर २०५० पर्यंत ही स्थिती गंभीर होईल असा इशारा देण्यात आलाय.
कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये १.३ पटीने वाढ होण्याची शक्यता
२०४ देशांच्या अभ्यासानुसार, १९९० ते २०२३ या काळात ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये जवळपास १.३ पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. स्टडीमध्ये दिलेल्या ६ रिस्क फॅक्टरवर वेळीच काम केलं नाही तर २०५० पर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यूची ७४ टक्क्यांनी वाढ
द लॅन्सेट ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेटर्समध्ये असं म्हटलंय की, भारतात १९९० मध्ये १००,००० महिलांमागे १३ महिला अशी सरासरी होती. मात्र हे प्रमाण २०२३ मध्ये १००,००० महिलांमध्ये २९.४ इतकं झालं आहे. त्याच काळात मृत्युदर ८.९ वरून १५.५ पर्यंत वाढलाय. ज्यामुळे भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये ७४ टक्क्यांनी वाढ झालीये.
२०५० पर्यंत रुग्णांची संख्या ३.५ दशलक्ष होऊ शकते
जगभरातील महिलांमध्ये कॅन्सरशी संबंधित आजार आणि अकाली मृत्यूचं प्रमुख कारण स्तनाचा कॅन्सर आहे. २०२३ पर्यंत अंदाजे २.३ दशलक्ष नवीन ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आणि ७,६०,००० मृत्यू अपेक्षित आहेत. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, आधुनिक उपचार असूनही २०५० पर्यंत रुग्णांची संख्या एक तृतीयांश वाढून ३.५ दशलक्ष होऊ शकते.
२०-५४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये नवीन रुग्णांचं प्रमाण वाढलं
जगभरात, २०२३ मध्ये ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये २०-५४ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा तीन पट जास्त वेळा ब्रेस्ट कॅन्सरचे नवीन रुग्ण आढळतील. दरम्यान १९९० पासून २०-५४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये नवीन रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे तर वृद्ध महिलांमध्ये हा दर कायम आहे.
जंक फूड टाळून पोषक आणि नैसर्गिक आहारावर भर द्यावा
अहवालात दिलासादायक बाब ही आहे की, जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास कर्करोगाचा धोका २८ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. वेळोवेळी मॅमोग्राफी आणि स्वतःहून तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच आजार लक्षात येतो. त्यामुळे वेळीच उपचार मिळतात. जंक फूड टाळून पोषक आणि नैसर्गिक आहारावर भर द्यावा. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करावा. यामुळे मोठ्या प्रमाणात धोका कमी करता येतो.. त्यामुळे वेळीच सावध व्हा, जंक फूड टाळा, आणि आरोग्याला सांभाळा.












