Scholarship Exam: ऐन उन्हाळ्यात इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २४ एप्रिल रोजी होणार आहे. वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर मोठा ताण येत असल्याची चर्चा सुरू आहे.
राज्याच्या शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इयत्ता ४ थी आणि ७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ऐन उन्हाळ्यात, तीव्र उष्णतेच्या काळात घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर मोठा ताण येत असल्याची चर्चा सुरू आहे.
ही परीक्षा २४ एप्रिल रोजी होणार असून सकाळी ११ ते १२.३० या वेळेत भाषा व गणिताचा पेपर होईल, तर दुसरा २ ते ३.३० या वेळेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर घेतले जातील. दोन्ही पेपर प्रत्येकी ७५ गुणांचे आहेत. अनेक परीक्षा केंद्रे शहरापासून दूर अंतरावर असल्याने लहान विद्यार्थ्यांना आणि पालकांना उन्हात प्रवास करावा लागणार आहे.
हेही वाचा: नवं घर उभं राहत असताना काळाचा घाला; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
काही जिल्ह्यात शाळांना सुट्ट्या
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आधीच तीव्र उष्णतेमुळे शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे. शासनाच्या निर्णयांमधील बदल आणि गोंधळामुळे परीक्षा प्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याशिवाय, १७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार ५ वी आणि ८ वीच्या परीक्षा आता ४ थी आणि ७ वी साठी घेतल्या जात आहेत. आधी झालेल्या परीक्षांनंतर पुन्हा परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक दोघांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, मुंबईतील १६४ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. काही शाळांना मान्यता देण्याची प्रक्रिया प्रलंबित असून निर्णय लांबणीवर पडल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. काही विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये हलवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे.
एकूणच, परीक्षा नियोजनातील गोंधळ, प्रशासकीय विलंब आणि शाळांच्या मान्यतेचे प्रलंबित प्रश्न यामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.








