Kolhapur trip food poisoning students : कोल्हापूर जिल्ह्यातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुरनूर येथील एका शाळेतील विद्यार्थी रत्नागिरी व कोल्हापूरला ४ दिवसांच्या सहलीसाठी गेले होते. मात्र, सहली दरम्यान जेवण केल्यानंतर नववी व दहावीतील १३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यांना चक्कर येणे, मळमळ होणे आणि उलट्यांचा त्रास जाणवत होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुगणालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
हेही वाचा – जळगावात हृदयद्रावक घटना! दोन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलले, गावकरी संतप्त
अक्कोलकोट तालुक्यातील कुरनूर नागनाथ विद्या विकास प्रशाळेतील 74 मुले-मुली कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांसह पर्यटन व देवदर्शनासाठी सहलीवर आले आले होते. या सहलीचा रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील मठात मुक्काम होता. सकाळी नाश्ता व जेवण करून ते कोल्हापुरात दाखल झाले. दिवसभर काही महत्त्वांच्या ठिकाणांची पाहणी करून मुलांनी दुपारी चार वाजता एका ठिकाणी जेवण केले.
मुलींना उलट्या-जुलाब आणि मळमळीचा त्रास
त्यानंतर एस.टी.मधून पुढील प्रवासाला निघत असतानाच काही मुलींना उलट्या-जुलाब आणि मळमळीचा त्रास सुरू झाला; तर काहींना भोवळ येऊ लागली. शिक्षकांनी त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी मुलींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. उपचारानंतर सर्वच मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. अचानक घडलेल्या घटनेमुळे मुली भेदरलेल्या अवस्थेत होत्या.












