Poet Vitthal Kulat : अकोल्याच्या अकोट येथे समाजाला उपदेश न देता, समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या साहित्यिक वऱ्हाडी कवी विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या अंत्य संस्कारावेळी सामाजिक संदेश दिला आहे. त्यांनी तेराव्यापर्यंत सर्व विधी पारंपरिक पद्धतीने न करता सुतक न पाळणे, अंधश्रद्धा झुगारून, स्त्री-पुरुष समानता, नदीत प्रेताची राख, अस्थी न टाकता प्रदूषण टाळून पर्यावरण राखणे असे अनेक सामाजिक संदेश दिलेत. दशक्रियेच्या दिवशी महिलांना घरीच ठेवले जाते. मात्र पुंडा येथील कुलट यांच्या घरी असलेल्या दशक्रियेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व विधी ह्या घरातील महिलांनीच केले आहेत. दहा दिवस संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधनात्मक अभंगाचे वाचन आणि श्रवण करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या स्थळी मंडप टाकून कोणताच बाट न मानता तेथील सर्व विधी ह्या महिलांनी केल्यात.
स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रदूषण रोखण्यासाठी चितेची राख व अस्थी नदीपात्रात टाकू नका. असे अनेक सामाजिक संदेश लोक आपल्या भाषणातून समाजापुढे मांडत असतात. मात्र हे समाजात राहून समाजाच्या विरोधात सत्यात आणणे कठीण असते. मात्र आपल्या साहित्यातून जनजागृती करणारे वऱ्हाडी कवी, नव्या साहित्यिकांना संधी देणारे प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांच्या वडिलांच्या अंत्यविधी नंतरचे सर्वच विधी ह्या पारंपारिक पद्धतीला फाटा फोडून समाजास एक आदर्श निर्माण केला गेला. हिंदू अंत्यविधी मधील तिसऱ्या दिवशीच्या विधीला राख ही नदीत सोडल्या जाते.मात्र विठ्ठल कुलट यांच्या म्हणण्यानुसार राखीने नद्या खराब होतात. तर त्यांनी ती राख आपल्याच शेताच्या चारही बाजूने शेतात खड्डा करून टाकली. तर अस्थी शेतात पुरवून तेथे फळ देणारे वृक्ष लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कावळा हा ठरवेल का मेलेला पुण्यात्मा होता की नाही?
२५ फेब्रुवारीला झालेल्या दशक्रियेला घरातील सुतक असणारे केस देत असतात. तर कुलट यांनी घरातील कोणीच केस देणार नाही, असे स्पष्ट सांगितले. कारण आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला, जग दाखविले, सुख समृद्ध केले, मोठ्या प्रमाणात धन दौलत दिली. मेल्या नंतर काय आपण त्यांना फक्त केस द्यायचे का? असा सवाल सुद्धा त्यांनी केल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच भात शिजवून पिंडदान केले जाते, नंतर कावळा ते खाण्यास येतो, ही सुद्धा प्रथा त्यांनी टाळली. कारण कावळा हा ठरवेल का मेलेला पुण्यात्मा होता की नाही? त्यामुळे विठ्ठल कुलट यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा फोडत तसेच अनेक स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले.






