Sanjay Raut : संजय राजाराम राऊत…पेशा…राजकारणी…आणि पत्रकार…काम-रोज सकाळी उठून भाजपाला आणि शिंदे गटाला डेली डोस देणे…तोच डेली डोस राऊतांनी आज पुन्हा दिलाय…या डेली डोसनं मात्र महायुतीला गुंगी आल्याशिवाय राहणार नाही, कारण अर्थमंत्रिपदी जयंत पाटलांची वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यानं तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आस लावून बसलेले अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते, त्यांची धाकधूक वाढलेली असतानाच अर्थमंत्रिपदाबाबत संजय राऊतांनी एक वेगळाच मार्ग काढलाय, एवढंच काय त्यांनी महायुतीला थेट सल्लाच दिलाय. राऊतांचं सल्ला द्यायला काय जातंय हो…पण आग महायुतीत लागतेय ना…राऊतांनी नेमकी कशी काडी टाकलीय…आणि त्याची आग कशी लागलीय?
अर्थमंत्रिपद जयंत पाटलांकडे की फडणवीसांकडे?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून कमालीचे नाट्य रंगले आहे. आता ‘अर्थ खाते’ कोणाकडे जाणार यावरून महायुती आणि विरोधी गोटात जोरदार खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे राज्याचे नवे अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण वादात एक अत्यंत स्फोटक विधान केले आहे. “राज्याचे अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिलेले शहाणपण आहे,” असे थेट विधान करत संजय राऊत यांनी नव्या राजकीय वादाची ठिणगी टाकली आहे. राऊत यांच्या या विधानामुळे आधीच अर्थमंत्रिपदासाठी आमनेसामने आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमधील रस्सीखेच अधिकच तीव्र झाली असून, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा गृहकलह आणि वाद निर्माण झाला आहे.
Devendra Fadnavis or Jayant Patil :
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू झाला असून, सत्तेच्या सारीपाटावर प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त महत्त्वाची आणि वजनदार खाती पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘अर्थ खाते’ हे अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असणारे खाते असल्याने, त्यावर सर्वांचाच डोळा असणे स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विचारसरणीवर चालणारी जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही बाजूंकडून अर्थमंत्रिपदावर फिल्डिंग लावल्याच्या चर्चा उठत आहेत. त्यातच जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा अचानक सुसाट सुटल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत होती. जयंत पाटील हे अनुभवी नेते असून त्यांनी यापूर्वीही राज्याचे अर्थमंत्री म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यामुळे महायुतीच्या संभाव्य विस्तारात किंवा बदलत्या समीकरणात जयंत पाटील यांच्याकडे ही धुरा सोपवली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय कॉरिडॉरमध्ये रंगू लागल्या होत्या.
Sanjay Raut :
मात्र, या सर्व चर्चांना आणि दाव्यांना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत छेद दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत, अर्थ खाते त्यांच्याकडेच राहणे राज्याच्या हिताचे आणि शहाणपणाचे ठरेल, असा सल्ला दिला आहे. राऊत यांचे हे वक्तव्य केवळ अजित पवार गटाला किंवा जयंत पाटील यांच्या समर्थकांना टोमणा मारणारे नाही, तर त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती असल्याचे बोलले जात आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, राज्यावरील कर्जाचा बोजा आणि सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या योजना लक्षात घेता, हे खाते सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखाच अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेला चेहरा हवा. जर हे खाते राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाकडे गेले, तर पुन्हा एकदा निधी वाटपावरून वाद आणि अंतर्गत हेवेदावे सुरू होतील, अशी भीती राऊत यांच्या विधानातून अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे.
राऊतांनी काडी टाकली सुनेत्रा पवारांचं नुकसान?
संजय राऊत यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार गटाकडून यावर तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे, कारण महायुती सरकारमध्ये अजित पवार यांनी नेहमीच अर्थ खात्यावर आपला अधिकार सांगितला होता, अनेक वर्षे हे अर्थखातं दादांकडेच राहिलं होतं, पण दादांच्या निधनानंतर हे अर्थखातं अतिरिक्त भार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि ते स्वतः अर्थमंत्री म्हणून काम पाहत आले आहेत. दुसरीकडे, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असताना राऊत यांनी फडणवीसांचे समर्थन केल्यामुळे महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटातही काहीसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस तर चव्हाट्यावर आलीच आहे, पण त्याचसोबत विरोधी पक्षांमधील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. अर्थमंत्रिपदासाठी दोन्ही राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या रस्सीखेचामुळे मंत्रिमंडळ रचनेचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच जटील बनला आहे.
या राजकीय नाट्याचा थेट परिणाम राज्याच्या प्रशासनावर आणि आगामी धोरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय रचनेत अत्यंत महत्त्वाचे केंद्रस्थान आहेत. त्यांच्याकडे अर्थ खाते राहिल्यास भाजपची राज्याच्या तिजोरीवर थेट पकड राहील, जी अजित पवार गट किंवा जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांना फारशी रुचणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना माहिती आहे की, ज्याच्याकडे अर्थ खाते असेल, त्याचा राज्यातील विकासकामांवर आणि पर्यायाने स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच हे खाते आपल्याकडेच राहावे यासाठी दोन्ही बाजूंकडून दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिल्डिंग लावली जात आहे. संजय राऊत यांनी या वादात उडी घेतल्यामुळे आता हा प्रश्न केवळ वाटपाचा राहिला नसून, तो पक्षांच्या प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा लढा बनला आहे.
अर्थात हे सगळं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये म्हणजेच एनडीएसोबत जाईल, सध्या तरी राऊत यांनी जी आग लावलीय, त्यावरून जाळ राहुद्या पण धूर तर निघूच लागलाय…पुढील काही दिवसांत यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देवेंद्र फडणवीस स्वतः या वादावर काय भूमिका घेतात आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते संजय राऊत यांच्या या ‘शहाणपणाच्या’ सल्ल्याला कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या विधानामुळे लागलेली ठिणगी महायुतीचा सुकाणू विझवू शकतो की यामुळे सत्तेच्या समीकरणात मोठी उलथापालथ होते, हे येणारा काळच ठरवेल.










