LS मराठी प्रतिनिधी,प्रशांत जगताप
सातारा: गोवा राज्य बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सातारा जिल्हा न्यायालयात मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली. येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत राज्यभरातून एकूण १५४ उमेदवार रिंगणात उतरले होते.
मतदानासाठी पारंपरिक बॅलेट पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता.सकाळपासूनच वकिलांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. सातारा जिल्हा बार कौन्सिलच्या एकूण सुमारे ५ हजार सदस्यांपैकी ३ हजार वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावत निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.
मतदान प्रक्रिया
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि नियोजन करण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात टप्प्याटप्प्याने वकिलांनी मतदानासाठी उपस्थिती लावली.महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे सव्वा दोन लाख मतदारांनी आपल्या-आपल्या जिल्हा केंद्रांवर मतदान केले.
किती सदस्य निवडले गेले?
या निवडणुकीत बार कौन्सिलसाठी एकूण २३ सदस्य निवडले जाणार असून, मतदारांना किमान ५ उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक होते; अन्यथा मतदान ग्राह्य धरले जात नाही.
हे उमेदवार निवडणूक रिंगणात
साताऱ्यातून अॅड. श्रीकांत केंजळे, वसंत भोसले आणि विजय पाटील हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील वकिलांच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त करत वकिलांनी मतदान केले.
दरम्यान, बॅलेट पद्धतीची मतदान प्रक्रिया किचकट व क्लिष्ट असल्याची प्रतिक्रिया काही वकिलांनी व्यक्त केली. बॅलेट पेपर मोठा असल्याने इच्छित उमेदवार शोधणे कठीण होत असल्याचे मत अॅड. प्रशांत नलावडे यांनी मांडले. भविष्यात बॅलेटऐवजी बटन पद्धतीने मतदान घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.या निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, निवडून येणाऱ्या प्रतिनिधींवर वकिलांच्या विविध प्रश्नांवर काम करण्याची जबाबदारी असणार आहे.












