Nerul Electric Shock: नवी मुंबईतील नेरूळ परिसरात दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेरूळ एलपी परिसरात विद्युत वाहिनीमध्ये अचानक बिघाड झाल्याने दोन्ही विद्यार्थिनी विजेच्या संपर्कात आल्या. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत वाहिनी अचानक तुटल्याने किंवा खाली आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा: “फोडाफोडीचं राजकारण देशासाठी घातक”; राज ठाकरेंचा केंद्र आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल
या घटनेबाबत महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनीही परिसरातील विद्युत यंत्रणेच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी डी. वाय. पाटील रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली.
घटनेनंतर भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. तसेच जखमी विद्यार्थिनींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील, याची खात्री करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.




