Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करत सध्याच्या राजकारणावर कठोर शब्दांत भाष्य केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करत सध्याच्या राजकारणावर कठोर शब्दांत भाष्य केले. देशात सत्तेसाठी घाणेरड्या पद्धतीने राजकारण सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका लोकशाहीला आणि पुढील पिढीला बसत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
अमरपट्टा घेऊन आलेला नसतो
राज ठाकरे म्हणाले की, कोणताही पक्ष सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. आज सत्तेत असलेल्यांनी असलेल्यांनी विरोधी पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, सत्ता कायमची कोणाकडेही राहत नाही. भविष्यात सत्ता बदलल्यानंतर याच पद्धतीचा फटका भाजपलाही बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
या दोन राज्यांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचा दावा
विशेष गहन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचा उल्लेख करत त्यांनी बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचा दावा केला. अशा निर्णयांमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की
राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगितले की, आज भाजप हा पक्ष प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे टिकून आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर भाजपमध्येही अंतर्गत संघर्ष आणि गटबाजी वाढेल. विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस विरोधक त्याच पक्षात तयार होतात, असे त्यांनी नमूद केले.
राजकीय नेत्यांवर टीका
पक्षांतराच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी, “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे,” असे म्हणत राजकीय नेत्यांवर टीका केली. “देहविक्रीला तयार असणाऱ्यांना गिऱ्हाईक मिळतातच,” या शब्दांत त्यांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
फोडाफोडीचे राजकारण
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, फोडाफोडीचे राजकारण आणि सत्तेसाठी सुरू असलेली स्पर्धा यामुळे विकासाचे प्रश्न मागे पडले आहेत. शहरांची उभारणी, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सहा खासदारांच्या पक्षांतराचाही उल्लेख
सहा खासदारांच्या पक्षांतराचाही उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हे खासदार थेट भाजपमध्ये का गेले नाहीत? यामागे कोणते राजकीय गणित आहे, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका
पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत फोडाफोडीच्या राजकारणावर मर्यादा असायला हव्यात, असे मत व्यक्त केले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून, त्यांच्या टीकेला भाजपकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











