Pavanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल १९ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर (Pavanraje Nimbalkar) दुहेरी हत्याकांड प्रकरणातील निकाल आणखी काही दिवस लांबला आहे. या प्रकरणाचा निकाल आज अपेक्षित असताना मुंबई सत्र न्यायालयाने निकालासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता असल्याचे सांगत सुनावणी १९ जूनपर्यंत तहकूब केली आहे.
न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपीना १९ जून रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या बहुचर्चित खटल्याचा अंतिम निकाल १९ जून रोजी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : वय वाढलं तरी चेहरा चमकेल! फक्त 4 घटकांतून तयार करा ‘DIY बोटॉक्स जेल’
काँग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या खटल्याला तब्बल दोन दशके पूर्ण झाली आहेत. दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता निकालाच्या दिशेने प्रकरण पोहोचल्याने निंबाळकर कुटूंबियांसह समर्थकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोशल मीडियावरील घडामोडींवरही पोलिसांचे विषेश लक्ष आहे.
काय आहे प्रकरण?
3 जून 2006 रोजी मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचे चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून हा हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, राजकीय वैमनस्यातून ही हत्या घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता या बहुचर्चित खटल्याचा निकाल जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजच्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल लागण्याची अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी आणखी काही दिवसांची आवश्यकता असल्याचे सांगत तो १९ जून रोजी जाहीर केला जाईल, असे निर्देश दिले. त्यामुळे या निकालाकडे केवळ धाराशिव जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.






