Akola Political Turnaround : अकोला महापालिका सत्तास्थापनेच्या अनुषंगाने महत्त्वाची अपडेट समोर आलीय. आज २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर अकोला पालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अकोल्यात ८० पैकी सर्वात जास्त ३८ जागा जिंकत भाजप एक क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, भाजपला महापालिकेच्या सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. अकोल्यात ३८ जागा जिंकलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी ३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. मात्र, सोडत जाहीर होताच प्रकाश आंबेडकर यांनी अवघ्या ४५ मिनिटांत वारं फिरवलं आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील उमेदवार ‘बेरोजगार’ सेवेत सामावून घेण्याची मागणी
अकोला महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अकोल्यात वंचित आघाडी, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक पार पडलीय. या बैठकीत महापौर पदासंदर्भात ४५ मिनिट चर्चा झाली अन् सर्व वारचं वेगळ्या दिशेने फिरू लागलंय.
अकोला महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक
एकूण ८० जागा असलेल्या अकोला महानगरपालिकेत भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक आहेत. मात्र, त्यांना बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे २१, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ६ वंचित बहुजन आघाडीकडे ५, एमआयएमकडे ३, शरद पवार राष्ट्रवादी ३, शिंदे सेनेकडे १, अजित पवारांची राष्ट्रवादी १ तर अपक्ष २ जागा निवडून आल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपने शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला होता. त्याचवेळी काँग्रेसने देखील ठाकरेंच्या शिवसेनाला प्रस्ताव दिला असून सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावं असं म्हटलं आहे. या सर्व नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
सत्ता स्थापनेसाठी ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ रगलं
अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ रगलं आहे. अकोल्यात भाजपला खोखण्यासाठी आज एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी आमदार साजिद खान आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. बुधवारीच काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव दिला होता. आमच्याकडे जरी 21 नगरसेवक असले तरी देखील आम्हाला कुठलंच पद नको आहे. मात्र सर्वांनी भाजपविरोधात एकत्र यावं असं काँग्रेसने आपल्या या प्रस्तावात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.












