Ajit Pawar Case CID Investigation : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी आज पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाच्या तपासाबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करताना त्यांनी ‘अशोक खरात’ या नावाचा उल्लेख करत या दिशेने तपास करण्याची आग्रही मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी आज सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महत्वाचे अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन आणि काही नवीन पुरावे सुपूर्द केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी तपासाच्या संथ गतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दादांच्या अपघाताला आता तीन महिने उलटून गेले आहेत, तरीही सीआयडीने या प्रकरणात कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही. मूळ संशयित मोकाट फिरत आहेत आणि यंत्रणा केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे.
अशोक खरात नावाच्या व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध
रोहित पवार यांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे खरात अँगल. अशोक खरात नावाच्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हे तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार, ज्या काळात हा अपघात झाला त्या दरम्यान खरात यांच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद आणि मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. एका सामान्य व्यक्तीच्या खात्यात अचानक इतके पैसे कुठून आले? हे पैसे कोणी दिले? आणि ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी या आर्थिक व्यवहारांचा वेग का वाढला? या प्रश्नांची उत्तरे सीआयडीने शोधायला हवीत, असे रोहित पवार म्हणाले. तसेच दादांच्या अपघाताच्या आधी दादांच्या निवास्थानाबाहेर अघोरी पुजाही झाल्याचा संशय आहे, त्यासंबंधीचे काही फोटो आणि बारामतीतील एक छोटा नेता असा उल्लेख रोहित पवारांनी केलाय, त्यामुळे हाही तपास सीआयडी करते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर
या प्रकरणातील विमान कंपनी व्हीएसआरबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी सरकारी पातळीवरून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याऐवजी कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. ही कंपनी कोणाची आहे आणि त्यांना कोणाचे आशीर्वाद लाभले आहेत, हे आता स्पष्ट व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
तपास रेंगाळत ठेवणे म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देणे
कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या झिरो एफआयआरचा मुद्दाही रोहित पवारांनी पुन्हा एकदा लावून धरला आहे. तांत्रिक कारणास्तव हा तपास रेंगाळत ठेवणे म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देण्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. सीआयडीने तात्काळ या एफआयआरची दखल घेऊन सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणे अपेक्षित होते, परंतु तसे घडलेले नाही. रोहित पवार यांनी सीआयडीला इशारा दिला आहे की, जर १० मेपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस प्रगती झाली नाही किंवा संशयितांना अटक झाली नाही, तर ते शांत बसणार नाहीत. आम्ही पुराव्यांची वाट पाहत होतो आणि आज आम्ही ते सर्व पुरावे अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. आता चेंडू सीआयडीच्या कोर्टात आहे. जर तपास भरकटला तर आम्हाला जनतेच्या न्यायालयात जावे लागेल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.











