Rohit Pawar got angry : अजित पवार विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. मात्र, काल मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले. इथं देखील गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे रोहित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांसोबत बोलाबोली झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच त्यांनी कबुतरे चोरीला जातात त्याचा एफआयआर होतो, मग अजितदादांचा का होत नाही? असा सर्वांना विचार करावा लगणारा सवाल उपस्थित केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विमान अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ खळबळ उडाली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घातपात आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
एफआयआर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सह्या केल्या
‘एफआयर व्हावा हे माझं, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे. सर्वांचं स्टेटमेंट आहे. आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं असतं तर केलं असतं. या पत्रावर सह्या आहेत. याचं कारण आमच्या काकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा एफआयआर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सह्या केल्या आहे. आम्ही चार चार पुस्तके वाचली. वकिलांनी सांगितलं तरी एफआयआर दाखल करून घेतला जात नाही,’ असं रोहित पवार म्हणाले.
१६० कबुतरे चोरीला गेले. त्याचा एफआयआर झाला
‘राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रोहित पवार म्हणाले, अजितदादा जर तुमचे मित्र होते तर त्यांचा एफआयआर का घेतला जात नाही. उद्या आम्हाला काय झालं तर त्याचं काय होणार. जनतेचं काय होणार. काल उरळी कांचनला १६० कबुतरे चोरीला गेले. त्याचा एफआयआर झाला. पण दादांचा एफआयआर होत नाही. हा कसला नाय. एफआयआर होत नसेल तर यात काळंबेरं नाही का,” अशी शंका देखील रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केली.
ते भावूक झाले, पण त्यांचा पेन FIRवर वळत नाही
“मी एवढेच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे. जेव्हा अंत्यविधी झाला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आताही आम्ही सांगताना ते भावूक झाले. पण त्यांचा पेन एफआयआरवर वळत नाही. याचा अर्थ त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. सत्तेतील लोकांना ते नको असेल,” असं आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.












