Sharad Pawar trusted associate retires from politics : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे सर्वत्र वारे वाहत आहेत. अशा परिस्थिती अनेक स्थानिक नेते सोईचे गणित जुळवून पक्षांतर करत आहेत. मात्र, काही नेते असे आहेत जे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. जे राजकारणात कसलीच तडजोड करत नाहीत. पुण्यातील स्थानिक नेते विशाल तांबे हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी कोणतीही तडजोड न करता थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
पुण्यासह राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुण्यात मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवारांचे विश्वासू सहकारी आणि माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहित राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितलं आहे. जरा विसावू, या वळणावर… या शीर्षकाखाली तांबे यांनी पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने दिली स्थगिती
ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात राजकारणातून संन्यास
ऐन महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय असलेल्या विशाल तांबे यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. विशाल तांबे हे सलग तीन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2007, 2012 आणि 2017 साली त्यांनी धनकवडी परिसरातून विजय मिळवला होता. विशाल तांबे यांनी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे.
आता थांबण्याचा निर्णय घेतला..
यानंतर बोलताना विशाल तांबे यांनी म्हटले की, मी महानगरपालिका निवडणुकांपासून दूर राहणार आहे. मी कुठेही पक्षावर नाराज नाही. 19 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी काम बघितले आहे, मात्र आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोर ही माझी भूमिका मांडली आहे असंही तांबे यांनी म्हटले आहे.
आपल्या पोस्टमध्ये विशाल तांबे यांनी म्हटले की, धनकवडी या माझ्या विस्तारित कुटुंबातील बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार… खरं तर मला खूप दिवसांपासून आपल्याशी मनापासून बोलायचं होतं. पण असं म्हणतात, काही गोष्टींचा काळ यावा लागतो. वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ आली आहे. म्हणून आपल्याशी हा आपुलकीचा संवाद साधतं आहे.
धनकवडीकरांच्या ऋणातून मला उतराई व्हायचं नाही
धनकवडी हे माझं कुटुंब. प्रत्येक धनकवडीकर नागरिक, माता-भगिनी माझ्या कुटुंबातील आणि मी तुमच्या कुटुंबातील सदस्य. हे आपलं नातं हळूहळू बहरत गेलं. आपुलकी आणि विश्वासानं ते अधिक घट्ट बनलं. अशा या जीवाभावाच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं भाग्य फार कमी लोकांना मिळतं. खरं तर तुमचे माझ्यावर खूप ऋण आहेत. या ऋणातून मला उतराई व्हायचं नाही, तर ते ऋणानुबंध मनात साठवायचं आहे. तुमच्या आठवणी जपायच्या आहेत.
विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार
आज मी जेव्हा आपली धनकवडी असं म्हणतो, तेव्हा मन आपोआप ३० वर्षे भूतकाळात जातं. मी या परिसराच्या प्रेमात व सहवासात वाढलो, घडलो. या परिसराशी नाळ जुळली गेली. त्यातूनच आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून काम करण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. विद्यार्थी-दशेपासूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार व जनसेवेची उर्मी उत्तरोत्तर वाढत गेली असं तांबे यांनी म्हटलं आहे.












