Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे. भाजप आणि शिंदे सेना यांनी प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील प्रचार सभेने फोडला. यावेळी सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हे दोन दिग्गज नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मागचा महापौर कसा झाला हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय आहे, भ्रष्टाचारच्या मगरमिठीतून मुंबईला सोडवायचं आहे, त्यामुळे यावेळी मुंबईवर महायुतीचाच भगवा फडकणार, असा हल्लाबोल शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केलाय.
हेही वाचा – ठाकरेंकडून शिंदेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेत मेगा पक्षप्रवेश
बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून फटके दिले असते – शिंदे
या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली आहे. मराठीचा मुद्दा घेऊन मनसे आणि ठाकरे सेना निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईला स्थगिती सरकार नको, तर प्रगती सरकार पाहिजे आहे. छत्रपती संभाजीनगरात यांनी रशिद मामूला तिकीट दिलं, आज बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून फटके दिले असते, असा हल्ला शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केला. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटात आता पुढील दहा दिवस आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
लक्षात ठेवा खरा ब्रँड फक्त बाळासाहेबच आहेत
जनतेनं बँड वाजवल्यावर यांना बँडची आठवण झाली. मात्र लक्षात ठेवा खरा ब्रँड फक्त बाळासाहेबच आहेत. तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे असते तर उलटं टांगून फटके दिले असते असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधु शिंदे यांच्यावर काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
मुंबईत काँग्रेसनेही ठाकरेंच्या सेनेला लाथ मारली
काँग्रेससोबत जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलं, मात्र मुंबईत काँग्रेसनेही ठाकरेंच्या सेनेला लाथ मारली. कोण खरा सूर्याजी पिसाळ हे जनतेला माहिती आहे. तुम्ही मराठीसाठी काय केलं? ठाकरेंचा मराठीचा पुळका खोटा आहे. काहींना निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो, मात्र आता स्वार्थी राजकारणाला मुंबईकर भुलणार नाहीत. भावनेवर मत मिळत नाहीत, लोकांना विकास लागतो, आम्ही विकासाचे वारकरी आहोत, लोकांना विकासाचे मारेकरी नकोत, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. बॉडी बॅगमध्ये कोणी घोटाळा केला? महापालिकेची कंत्राट देताना मराठी माणसं आठवली नाहीत का? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.












