Mira-Bhayandar Congress–Shinde Sena Alliance : मागील आठवड्यात राज्यातील २९ महापालिकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात अनेक महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी विचित्र युती आणि आघाड्या पाहायला मिळाल्या. असाच एक प्रकार मिरा-भाईंतर महानगरपालिकेत पाहायला मिळत आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढलेली शिंदे सेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपचा गेम केल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अनेक महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोध एकवटल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रत्यय मिरा-भाईंदर पालिकेत देखील आला आहे.
हेही वाचा – ‘मेलो तरी बेहत्तर पण त्या २ व्यापाऱ्यांच्या दावनीला जाणार नाही’; उद्धव ठाकरेंनी दिली शपथ
मिरा-भाईंदरमध्ये भाजप विरोधात इतर सर्वच पक्षांनी मोट बांधली आहे. काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाची या ठिकाणी युती झाली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस आणि शिंदेसेना यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केल्याने भाजपवर काय परिणाम होतो आणि वरिष्ठ नेते त्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
काँग्रेस-शिवसेना युतीवर प्रताप सरनाईक यांचं भाष्य
राज्यात इतरही ठिकाणी विविध प्रयोग होत असल्याने मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेससोबत युती केल्याने वेगळं काय केलं असा ही सूर काही नेते आळवत आहेत. काँग्रेस-शिवसेना युतीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं भाष्य केलं. मिरा भाईंदर महापालिकेत सर्व विरोधक एकत्र आले त्यांनी शहर आघाडी स्थापन केली आहे. आम्ही महापालिकेत काही चुकीचं घडू देणार नाही. १६ नगरसेवकांनी पक्ष न बघता शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. चुकीचं काही होत असले तर त्यावर अंकुश ठेवला जाईल. त्यांचं वर्चस्व आहे, मान्य करावे लागले. राज ठाकरे यांनी मला पाठिंबा दिला हे माहिती नाही. त्यांचे अभार मानतो, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली.
विविध पक्ष भाजपविरोधात एकत्र आल्याचे चित्र
अकोला, चंद्रपूर, सोलापूर, परभणी, लातूर इथेही विविध पक्ष भाजपविरोधात एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध आघाड्या तयार होत आहे. विविध गटांची स्थापन होऊन भाजपविरोधात महापालिका काबीज करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुद्धा अशी युती आणि आघाडी तयारी करण्याची घाई राजकीय पक्षांना झालेली दिसत आहे.
भाईंदर शहराचा महापौर मराठीच असावा
भाईंदर शहराचा महापौर मराठीच असावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची पाठराखण करताना दिसत आहेत. मराठी महापौराच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समिती व मनसेकडून सातत्याने आवाज उठवला जात असताना, सत्ताधारी पक्षांकडून मात्र या मागणीला थेट विरोध न करता राजकीय डावपेच खेळले जात असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपकडून मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे ‘मराठी अस्मिता’ हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. आगामी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, शहरातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












