Nashik Accident News | नाशिकमध्ये (Nashik) मोठा भीषण अपघात (Accident) घडला आहे. एक भरधाव चारचाकी कार विहीरीत कोसळून भीषण अपघात घडला (Nashik Car Accident) आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – CDR समोर? शिंदे-खरातचे १७ कॉल, चाकणकरांचे १७७ कॉल…
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी शहरात शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत चारचाकी कार कोसळली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये 3 ते 4 लहान मुलांचा देखील समावेश होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्त्याशेजारील विहिरीत ती कोसळून अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
सुनील दरगोडे, त्यांच्या कुटुंबातील लोकं आणि इतर नातेवाईक एका कार्यक्रमातून घरी परत येत होते. मात्र, घरी परत येत असतानाच दरगोडे कुटुंबावर काळाने घाला घातला. वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा अचनाक सुटला आणि भरधाव वेगाने पळणारी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे आणि रात्री खूप अंधार असल्यामुळे कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर येता आलं नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातनंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनानं मदतीसाठी तातडीनं धाव घेतली होती. तर आता स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील सर्वजण हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर 9 मृतांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. यामध्ये राखी सुनील दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे आणि श्रद्धा अनिल दरगोडे अशी मृतांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे. विहिरीत पडलेली ईरटीका कार अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेली आहे. तर कारमधील नऊही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शोक व्यक्त केला जात आहे.












