3 Major Reasons : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए युतीला 202 जागांवर विजय मिळाला, तर विरोधी महाआघाडीला फक्त 34 जागांवर विजय मिळवता आला. एनडीएत भाजपला 89 जागा, जेडीयूलाला 85 जागा आणि एलजेपीला (रामविलास पासवान) 19 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाआघाडीत राजदला 25, तर काँग्रेसला केवळ 5 जागा, तर डाव्या पक्षांना ४ मिळाल्या. त्यानंतर आता महागठबंधन च्या पराभवाची कारणे समोर येत आहे. ते जाणून घेऊया..
यातील प्रमुख कारण म्हणजे ‘जातीय समीकरण‘
बिहारच्या राजकारणात जातीय समीकरणांना सर्वाधिक महत्व राहिलेलं आहे. या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजप जातीय समीकरणं आपल्या बाजूनं ठेवण्यात यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत अतिमागासवर्गीय म्हणजे ईबीसी जाती काय करणार याची बरीच चर्चा होती. गेल्या अनेक निवडणुकांपासून हा ईबीसी मतदार प्रामुख्यानं नितीशकुमारांच्या पाठीशी राहिला आहे. खरं तर, ईबीसींचा पाठिंबा हे नितीशकुमारांच्या निवडणुकीतील यशाचं एक महत्वाचं कारण मानलं जातं. म्हणूनच या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीनं ईबीसींना आपल्या बाजूने खेचण्याचा जोरदार प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना सफसेल अपयश आलं.
“जर आपण आरजेडीला सत्ता दिली, तर यादव समाजाचे वर्चस्व प्रस्थापित होईल अशी भीती ईबीसींमध्ये असल्याचं मानलं जातं.” आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आरजेडीने जरी ईबीसींना सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी त्याचे प्रतिबिंब तिकीट वाटपात दिसले नाही. तिकीट वाटपात आरजेडीकडून यादव उमेदवारच मोठ्या प्रमाणात देण्यात आले. यामुळे या निवडणुकीत आरजेडीची भिस्त प्रामुख्यानं ‘मुस्लीम-यादव’ समीकरणापुरतीच मर्यादीत राहिलेली दिसली आणि त्यातील काही मतदान एनडीए किंवा एमआयएमकडे गेलेलं दिसत आहे.
महिला मतदारांची निर्णायक भूमिका
महिला मतदारांची भूमिका या निवडणुकीतही महत्वाची ठरली. ईबीसींप्रमाणेच महिला मतदार हा नितीशकुमारांचा पाठीराखा मानला जातो. या निवडणुकीत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिलांना लघुउद्योग किंवा व्यवसायासाठी 10 हजार रूपये देण्याची योजना नितीशकुमारांनी आणली आणि ती गेमचेंजर ठरेल, असे मानले जात होते. त्याचा एनडीएला या निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसत आहे. “नितीशकुमारांनी बिहार राज्यात केलेली दारूबंदी, मुलींसाठी सायकली देण्याची योजना, महिलांसाठी विविध योजना यांचा प्रभाव महिला मतदारांवर पडलेला आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचंही महिला मतदारांचं म्हणणं आहे. त्यासोबतच या निवडणुकीत 10 हजारांच्या मदतीची योजना आणल्यानं महिला मतदारांवर त्याचा प्रभाव पडल्याचं दिसत आहे.”
‘महागठबंधन‘मध्ये समन्वयाचा अभाव
एकीकडे एनडीए अधिक मजबूत दिसत असताना आरजेडी, काँग्रेस, डावे, व्हीआयपी यांच्यातील महाआघाडीतील धुसफूस, बेबनाव अगदी उघडपणे दिसत होता. जागावाटपावरून आरजेडी आणि काँग्रेसमधील मतभेद अगदी तुटेपर्यंत ताणले गेले होते. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांना पाठवून दोन्ही पक्षांच्या जागावाटपात समेट घडवून आणावा लागला. तरीही काही जागांवर सहमती न झाल्यानं आघाडीतील पक्षांनीच एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केल्याचं दिसलं.
या आघाडीत प्रामुख्यानं भिस्त आरजेडीवर होती आणि इतर पक्षांची राज्यव्यापी लक्षणीय ताकद नसल्यानं ही आघाडी एनडीएसमोर कमकुवत ठरल्याचं दिसून आलं. प्रचारात जर पाहिले तर तेजस्वी यादव यांनी झंझावाती प्रचार केला, पण तुलनेनं काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा प्रचार झंझावाती दिसला नाही. ‘व्होट अधिकार यात्रे’तून राहुल गांधीं यांनी चैतन्य निर्माण केले होते. पण त्यानंतर त्यांचा प्रचार जोरकसपणे दिसला नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे मित्रपक्षांनी ज्याप्रकारे कामगिरी बजावायला पाहिजे होती, तिचा स्पष्ट अभाव दिसून आला. शिवाय, एनडीएनं समोरची आघाडी जंगलराजचं ओझं घेऊन आलेली आहे, हे त्यांनी वेळोवेळी ठसवलं. त्यामुळेही, त्याचा फटका महागठबंधनला बसलेला दिसून आला. महागठबंधनच्या पराभवाची ही प्रमुख कारणे आहेत.












