Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुखे आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ मंगळवारी संपला. यावेळी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंचा निरोप समारंभ पार पडला. अत्यंत भावूक अशा वातावरणात हा निरोप समारंभ पार पडला. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले.
उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उद्धव ठाकरे यांच्यासह 8 सदस्यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपला आहे. या निमित्ताने विधान परिषदेत निरोप समारंभ घेण्यात आला होता. या निरोप समारंभादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या व्यक्तीमत्त्वाचा अनोखा पैलू उलगडला. राजकारणासोबत उद्धव ठाकरेंच्या कलेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुक केलं.
उद्धव ठाकरेंना निरोप देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे फक्त राजकारणी नाहीत तर ते एक उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या विविध छटा कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी वारीचे चित्रीकरण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून मोठी जोखीम घेतली होती, ही जोखीम त्यांच्या या कलेप्रती असलेल्या प्रेमाची साक्ष देते. फोटोग्राफी हा त्यांचा विशेष छंद असून त्यांनी तो उत्तमरित्या जपला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे शब्दांचे धनी असून त्यांनी त्यांचा मूळ स्वभाव, नाते जपण्याचा प्रयत्न केला आहे.
‘पुन्हा येईन’ वाक्याचा संदर्भ घेत फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य
उद्धवजींच्या स्वभावामध्ये राजकारण कमी आणि एका कलाकाराचे मन जास्त दडले आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले की, 2014 नंतरची जवळीक आणि 2019 मध्ये निर्माण झालेला आमच्यातील राजकीय दुरावा. माझा हात पकडून ज्यांना चालायचे होते ते काही गोष्टी धरून बसले. राजकारणामध्ये मतभेद होत असतात. आपण कधी सोबत असतो तर कधी विरोधात, पण त्या पलीकडे सहप्रवासी असण्याचे एक वेगळेच नाते असते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मी पुन्हा येईन’ हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य महाराष्ट्रात चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. तर या वाक्याचा संदर्भ घेत फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी सभागृहात पुन्हा एकदा निवडून यावे अशी आमची इच्छा आहे. कारण सभागृहात त्यांना ऐकायला नेहमीच आनंददायी वाटते. त्यामुळे त्यांनी पुढील 6 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून यावं आणि पुन्हा भेटू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.












