Ambadas Danve Threat Call | महाराष्ट्राच्या राजकारणातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबादास दानवेंना धमक्यांचे फोन (Threat Call) आले होते. तर याप्रकरणी आता दानवेंनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालही गाण्यातून घेणार ब्रेक? स्वत:च कारण देत म्हणाली, “जोपर्यंत माझा आवाज…”
अंबादास दानवेंना नेमकी काय धमकी देण्यात आली?
अंबादास दानवे यांना मध्यरात्री छमक्यांचे फोन आले होते. ठोकून काढू, कापून काढू अशा थेट धमक्या अंबादास दानवेंना दिल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर दानवेंनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी ज्या नंबरवरून धमकीचा फोन आला तो नंबरही दिला आहे.
अंबादास दानवेंनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात संपूर्ण माहिती दिली आहे. दानवेंनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च, 12 मार्च, 13 मार्च आणि 14 मार्च असे लागोपाठ चार दिवस त्यांना धमकीचे फोन आले आहेत. कापून टाकू, ठोकून टाकू असे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली असल्याचं दानवेंनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
मध्यरात्री आपल्याला फोन येत असून जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली जात आहे. तीन ते चार लोकांनी फोन करून धमकी दिली आहे. या प्रकरणानंतर माझ्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या घटनेचा कसून तपास केला जावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशा मागणी अंबादास दानवेंनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
धमकी देण्यात आल्यानंतर अंबादास दानवे काय म्हणाले?
या घटनेबाबत अंबादास दानवेंनी माध्यमांसमोर भाष्य देखील केलं. ते म्हणाले की, मी अशा धमक्यांना घाबरत नाही. पण मी कोणत्याही दौऱ्यावर असताना घरी माझे कुटुंब असते. माझ्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी पोलिसांना संशयित फोन नंबर सोपवले असून कारवाई मागणी केली आहे.
अंबादास दानवेंनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे. दानवेंना कुणी धमक्या दिल्या? आणि का दिल्या? यामागे कुणाचा हात आहे? या सर्व गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत.
दुसरीकडे, अंबादास दानवेंना धमकीचे फोन आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. धमकी देणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तर अंबादास दानवेंना धमकीचे फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












