मुंबई MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अखेर नाट्यमय घडामोडींसह संपली. शुक्रवार सकाळपर्यंत महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्ट दिसत होते, परंतु तासभर चाललेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर समीकरणं पूर्णपणे बदलली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत, काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचा आदर करते आणि महाविकास आघाडीची एकता टिकवण्यासाठी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची घोषणा केली.
हेही वाचा : शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार; शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूं म्हणाले….
काँग्रेसनं व्यक्त केली होती नाराजी :
यापूर्वी, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती आणि स्वतःचा उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी शिवसेना (UBT) नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यात झालेल्या बैठकीत हा वाद मिटला, ज्यामुळं भविष्यातील निवडणुकांबाबत परस्पर सामंजस्य निर्माण झालं. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि अनिल देसाई हेही उपस्थित होते, ज्यामुळं आघाडीची ताकद अधोरेखित झाली.
10 जागांसाठी 10 उमेदवार :
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं, आता हे स्पष्ट झालं आहे की 10 जागांसाठी केवळ 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. सत्ताधारी आघाडी महायुतीच्या वतीनं भाजपाकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्यावर विश्वास ठेवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं (अजित पवार) झीशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षांकडून केवळ अंबादास दानवे रिंगणात आहेत.
औपचारिक घोषणा बाकी :
उमेदवारांची संख्या रिक्त जागांच्या संख्येइतकीच असल्यानं, 12 मे रोजी निवडणूक घेण्याची आता आवश्यकता नाही. उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या कालावधीनंतर, निवडणूक आयोग सर्व 10 उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचं अधिकृतपणे जाहीर करेल. काँग्रेसचं हे धोरणात्मक पाऊल आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आघाडी एकसंध ठेवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे.








