मुंबई Ambadas Danve : राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी उमेदवाराची घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असतील, असं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं. या घोषणेमुळं पक्षातील इतर अनेक नावांच्या शर्यतीला पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा : मस्साजोग पोटनिवडणूक निकाल जाहीर; स्वरूपानंद देशमुख विजयी, अश्विनी देशमुखांचा 92
काय म्हणाले आदित्य ठाकरे :
अंबादास दानवे पक्षाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत सांगितलं की, दानवे यांचा अनुभव आणि सभागृहातील प्रभावामुळं आघाडीनं त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यासह शिवसेनेनं (UBT) आपल्या जुन्या आणि विश्वासू नेत्यांवर अवलंबून राहत सभागृहातील आपलं संख्याबळ कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय.
सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावांच्या चर्चांना पूर्णविराम :
शिवसेना (UBT) आपल्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांना विधान परिषदेवर पाठवू शकते, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. इतकंच नाही, तर उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर पुन्हा निवडून येऊ शकतात, असाही दावा करण्यात आला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनं या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे.
अनेक मुद्यांवर सरकारला पकडलं कोंडीत :
अंबादास दानवे यांच्या उमेदवारीमागे अनेक धोरणात्मक कारणं दिली जात आहेत. मराठवाडा भागातून येणाऱ्या अंबादास दानवे यांची संघटनेवर मजबूत पकड आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडलं आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), यांनीही दानवे यांच्या उमेदवारीला सहमती दर्शवली असून, यातून आघाडीतील संपूर्ण एकतेचे संकेत मिळत आहेत.
सत्ताधारी पक्षासमोर आव्हान :
आदित्य ठाकरे यांच्या घोषणेनंतर आता सर्वांचं लक्ष सत्ताधारी पक्षाच्या (महायुती) उमेदवारांवर लागलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसाठी, अंबादास दानवे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याविरुद्ध जागा जिंकणं हे एक मोठं आव्हान असेल.










