CM Youth Training Scheme Unemployed Candidates : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याची मागणी होत आहे. कारण प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतरही त्यांना रोजगार मिळत नाही. या मागणीसाठी प्रशिक्षणार्थींनी अकोल्यात आंदोलने सुरू केली आहेत, ज्यात त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सामावून घेण्याची प्रमुख मागणी आहे. ही योजना उद्योजकांकडून व्यावहारिक प्रशिक्षण देते, पण प्रशिक्षणानंतर कायम नोकरीची हमी नसल्याने उमेदवार नाराज आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रलंबित मागण्यांच्या चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात उद्या शुक्रवार २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडणार आहे.
हेही वाचा – पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धा मार्गावरील शाळा 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेनंतर राहणार बंद
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार आहेत. या युवा प्रशिक्षणार्थीना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदना द्वारे युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने केली आहे. त्यानंतर या चर्चेसाठीच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. सरकारकडे निधी नाही, अनेक विभागात रिक्त पदे आहेत. आम्हाला कायम करा, असा आमचा हट्टाहास नाही परंतु ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे, असे मत उमेदवारांनी व्यक्त केलं आहे.
दीड वर्षापूर्वी आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले. 6 हजार ते 10 हजार रूपये पगार देऊन आमच्याकडून कामे करू घेण्यात आली. सहा महिन्यांनी आम्हाला काढून टाकण्यात आले. त्यानंतर आंदोलन केल्यामुळे पुन्हा 5 महिने कामावर घेतले. आम्ही अकरा महिने काम केले आहे. आता आम्ही बेरोजगार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना सध्या रोजगार नाही.
रोजगार मिळण्यासाठी शासनाने किमान कंत्राटी पध्दतीवर शासकीय सेवेत घ्यावे. या मागणीसाठी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आवाज उचलण्यासाठी राज्यभरातून आलेल्या युवा – युवतीवर लाठीचार्ज करण्यात आला. मग कसल्या लाडक्या बहिणी अन कसला लाडका भाऊ असा प्रश्न प्रशिक्षणार्थ्यांनी केलाय. तर मागणी मान्य न झाल्यास बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय.












