District Council Panchayat Samiti Elections : सध्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष सध्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता मोठी बातमी समोर आलीय. गेली अनेक वर्ष बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद असणार आहे. यावेळी राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिल्यानंतर किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार आहे. आज सांयकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा – जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. काल १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही मागणी मान्य केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने येत्या १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. यामुळे आयोगाकडून तातडीने आज हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद #जिल्हा_परिषद#पंचायतसमिती #पत्रकार_परिषद #निवडणूक #निवडणूक_आयोग #StateElectionCommission#SEC_Maharashtra pic.twitter.com/hCmsgjYE54
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) January 13, 2026
१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा समावेश
या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्जाची विक्री, छाननी, माघार आणि प्रत्यक्ष मतदानाची तारीख कधी असणार याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.
जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे
प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षणाच्या कायदेशीर कचाट्यामुळे दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकींनंतर आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.












