Deforestation in Tapovan in Nashik : महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जय्यत तयारी करण्यात येत आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह अभिनेत्यांसह राजकीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्याने नाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – शीतल तेजवानीला बेड्या, राजकीय नेत्यांच्या मुलांना पायघड्या
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील वृक्ष तोडीला विरोध दर्शवला आहे. मात्र, आता तपोवन प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..
ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..
तेव्हा गप्प का ?
सर्व धर्म सम भाव ?— Nitesh Rane (@NiteshNRane) December 4, 2025
काँग्रेसची मंत्री राणेवर सडकून टीका
प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो आहे, काय करत नाही, पुढची पिढी आपल्यास काय म्हणेल? याचा विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपलं मंत्रिपद आणि आपलं राजकारण टिकणं यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाड तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला नाही का? शेकडे वर्षापासून नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. तेव्हा झाड तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का झाड तोडत आहात? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
खासदार भास्कर भगरे यांचे केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन
नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध करत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले आहे. तपोवनातील वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली असून आता हा मुद्दा थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक संघटनांकडूनही तपोवनातील झाडे तोडू नयेत, यासाठी सातत्याने आंदोलन व मागण्या होत आहेत.









